भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यानंतर शिवसैनिक आता नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. नितेश राणे यांच्यासमोर सध्या दोन अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे नितेश राणेंनी राणीबागेसंबंधी केलेल्या ट्वीटनंतर शिवसैनिकांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांबाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा नितेश राणेंवर आरोप आहे. तर दुसरीकडे हत्येचा प्रयत्न झाल्याच्या एका प्रकरणात चौकशी करत असताना आरोपीने नितेश राणे यांचं नाव घेतलं असल्याने कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

….तर मी माफी मागण्यास तयार

राणीबागेसंबंधी ट्वीट प्रकरणी शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी कोणाच्या भावना दुखावल्या आहेत याबदद्दल विचार केला पाहिजे. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं. अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं असं काही आहे का? समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी”.

पुणे पोलिसांच्या लुकआउट सर्क्यूलर नंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझ्या ट्वीटबद्दल शिवसेना रोजच आक्रमक होत असते. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना दुसरं काय काम आहे. यापेक्षा एसटी कामगार, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक झाले असते तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“मला जी माहिती मिळाली त्यानुसार मी ट्वीट केलं होतं. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आधी त्यांनी हिंदूंची माफी मागावी, मग मी माफी मागण्यास तयार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

राणीबागेसंबंधी काय ट्वीट केलं होतं –

तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का? अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्वीट करत केली होती.

“कणकवली पोलिसांना माहिती दिली आहे”

“कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे,” असं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

आदित्य ठाकरेंची चौकशी होणार का?

नितेश राणे यांनी यावेळी सर्व प्रकरणांची अशी चौकशी होणार का विचारणा करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाला होता. मुंबई पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत का? कायदा सर्वांसाठी समान असतो,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitesh rane ranibaug shivsena worli police station sgy