Buldhana Accident: विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली आणि बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट?

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

अपघतातील मृतदेहांची ओळख पटवण्याचं आव्हान आहे. कारण मृतदेह होरपळले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ड्रायव्हर वाचला आहे त्याची चौकशी सुरु आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. बस जर पोलवर आदळली ही मानवी चूक असू शकते. पण आज त्यावर बोलणं योग्य होणार नाही. जो काही प्रकार घडलाय तो गंभीर आहे. आत्ता आम्ही घटना स्थळावर जातो आहोत. समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी उपाय योजना आपण करतो आहोत. स्मार्ट सिस्टिमही बसवण्याचं काम सुरु आहे. चालक यांना सूचना कशा देता येतील? ते टोल नाक्यावर आल्यानंतर त्यांना सूचना कशा देता येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला होता तेव्हा अपघात वाढले होते. नेमून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने चालक गाडी चालवतात अशा गोष्टींमुळे या घटना घडतात. त्यामुळे प्रबोधन करणं आवश्यक आहे तेदेखील करण्याचा प्रयत्न आमचा आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.

बस अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांनी काय सांगितलं आहे?

नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बस मध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचं जेवण झालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती या प्रवाशांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर घटना स्थळी पोलीस आले, अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असंही या दोन प्रवाशांनी सांगितलं.

पोलिसांनी या अपघाताविषयी काय सांगितलं?

साधारण रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवासी वाचले आहेत. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डीझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असंही पोलिसांनी सांगितलं. बसच्या केबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. एकजण झोपला होता तर दुसरा गाडी चालवत होता. एक चालक बचावला असून दुसऱ्याचा मृत्यू झाला अशीही माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana accident is shocking heart wrenching said maharashtra deputy cm devendra fadnavis and expresses grief scj