अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारला. यानंतर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. मात्र, त्यांच्या या ट्वीटवर नागरिकांनी ‘काय खोटं बोलता’ असं म्हणत राज्यात कोणकोणत्या ठिकाणी वीज खंडीत झाली आहे याची यादीच सांगितली. महाराष्ट्रातील विविध राज्यातील युजर्स त्यांच्या भागात कोठे वीज नाही हे सांगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजर्सकडून संचालक ट्रोल, राज्यात कोठे लाईट केली याची यादीच वाचली

एका युजरने म्हटलं, “अरे सर काय खोटं बोलता. यवतमाळ जिल्ह्यातील वीज पुरवठा २ तासांपासून खंडित झाला आहे. तुमची पर्यायी व्यवस्था कुठं आहे?”

पुण्यातील एका युजरने म्हटलं, “पहाटे ४ वाजल्यापासून शिवणे,उत्तमनगर,खडकवासला या भागात विद्युत पुरवठा खंडित केला गेला आहे. जर पर्यायी व्यवस्था झाली असेल, तर असे होणे योग्य नाही.”

पुण्यातील अन्य एका युजरने म्हटलं, “रात्री साडेबारा वाजल्यापासून पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वीज नाही. वीज महावितरण कंपनीचा फोनही कोणी उचलत नाही. कृपया मदत करावी.”

एका युजरने तर मोदी सरकारवरच निशाणा साधला. ते म्हणाले, “अहो साहेब खासगीकरण झाले, तर तुमचाही नंबर लागेल. त्यासाठी तुम्हीही कर्मचाऱ्यांना साथ द्यावी, अशी विनंती आहे. यात खुप लोकांचे नुकसान होत आहे. जनतेकडून अव्वाच्या सव्वा वीजदर आकारून लुटेल. पुरेशी वीज न मिळाल्याने बळीराजाचे हाल होतील. जनता उपाशी मरेल.”

“बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील वीजपुरवठाही रात्री २ वाजल्यापासून खंडित झाला,” अशी तक्रार एका युजरने केली. अन्य एक युजर म्हणाला, “पालघर जिल्ह्यातील मोखाडा, बदलापूर, शहापूर, पडघा, वसई विरार, अंबाडी (वाडा) विभागात रात्रीपासून वीज नाही. पर्यायी व्यवस्था कुठे आहे?”

MSEB Employee Strike : “आपल्याला महावितरणसारख्या कंपनीची गरजही लागणार नाही, कारण…”, MSEB च्या संचालकांचं मोठं विधान

MSEB संचालक नेमकं काय म्हणाले?

विश्वास पाठक म्हणाले, “राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.”

हेही वाचा : ग्रामीण भागातील वीजसमस्येमुळे कृषी पर्यटन, व्यवसायावरही परिणाम ; ग्रामस्थांची तोडगा काढण्याची मागणी

नेमकं प्रकरण काय?

महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, महावितरण कंपनीला चांगले उत्पन्न मिळत असलेली किंवा वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले असलेले विभाग खासगी वीज कंपनीकडे जातील आणि महावितरण कंपनी आणखी आर्थिक अडचणीत सापडून शासकीय वीजकंपन्यांचे खासगीकरण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे महावितरण कंपनीतील ३० कर्मचारी-कामगार संघटनांनी संपाचे पाऊल उचलले. हा संप तीन दिवस सुरू राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens troll mseb director vishwas pathak over no electricity amid protest in maharashtra pbs