Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लेख लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढले नाहीत तेवढे मतदार निवडणुकीच्या काळात वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यानंतर यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, “रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्याने त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला होता, निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळं सप्रमाण दिलं. पण रोज खोटं बोलायचं ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत.”
“जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत. जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. मला वाटतं स्वतःशी खोटं बोलून स्वत:ला दिलासा देण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागं झालं पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस.
दरम्यान राहुल गांधी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल अनेक आक्षेप नोंदवले आहेत. यावेळी त्यांनी गेल्या काही निवडणुकांची आकडेवारी देखील सादर केली आहे. राहुल गांधींनी बोगस मतदारांनी मतदारयादी फुगवणे, मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान, बोगस मतदान असे वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत.
“संसद अधिवेशनात, लोकसभेच्या सभागृहात ३ फेब्रुवारी रोजी माझ्या भाषणात आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही मी महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी चिंता व्यक्त केली होती. माझे हे मत क्षुल्लक फसवेगिरीविषयी नाही, तर राष्ट्रीय संस्थांना ग्रासणाऱ्या घाऊक प्रमाणातील फसणुकीविषयी होते आणि आजही आहे. त्याही आधीच्या काही निवडणुकांचे निकाल माझ्यासह अनेकांना अजब वाटले होतेच; मात्र २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विचित्रपणा ढळढळीत होता. त्यात हेराफेरीचे प्रमाण इतके भयावह होते की, त्यावर पांघरूण घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही अधिकृत आकडेवारीतूनच स्पष्ट पुरावे समोर आलेले आहेत,” असे राहुल गांधी त्यांच्या लेखात म्हणाले आहेत.