राज्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. शेकडो एकरवरील शेतीचं या पावसामुळे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी फडणवीसांनी मोदींशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल फडणवीसांनी माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधानांकडून मदतीचे आश्वासन मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांना मी एक निवेदन दिले आहे. त्यांना एकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना आम्ही दिली. कशा पद्धतीचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सांगितलं. त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करा. त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनी सांगितले की लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की त्यावर कारवाई करू. शक्य तेवढ्या जास्त मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात डिफेन्स कॉरिडॉर

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही प्रकल्पाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादरीकरण केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, याव्यतिरिक्त महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात देखील मी प्रझेंटेशन मी केले आहे. ज्याच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं की, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होत आहे. ज्यामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होऊन रोजगार निर्मिती होईल. तीन ठिकाणी हा कॉरिडॉर करता येईल हे आपण दाखवलं आहे. याचा पहिला भाग पुणे, अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगर येथे आपण करू शकू, दुसरा भाग नाशिक, धुळे वगैरे या भागात आणि तिसरा भाग नागपूर, वर्धा आणि अमरावती या भागात करू शकू, याचा रोडमॅप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणणीस म्हणाले. यावर देखील पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

देशातील सर्वात स्वस्त स्टील

गडचिरोलीत माइनिंग कॉर्पोरेशनला माइन्स देऊन, खाण कामाचा विकास योग्य प्रकारे केला तर… त्याचा एक रोडमॅप मी मांडला आहे, की आपण देशातील सर्वात स्वस्त स्टील आपण तयार करू शकतो. चीनपेक्षाही स्वस्तात स्टील आपण तयार करू शकतो. याबरोबरच ग्रीन स्टील तयार करण्याचा रोडमॅप देखील मी पंतप्रधान मोदींसमोर ठेवला आहे. त्यालाही पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

दहीसर येथील जागेचे हस्तांतरण

दहीसर पूर्व येथील ५८ एकर जागेची मालकी ही भारतीय विमानतळ प्राधीकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता. पण, डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे एमएमआरडीएने माघार घेतली. या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे. या भागात एचएफ रिसिव्हींग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबला आहे. हे हस्तांतरण झाल्यास या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी आणि विकासासाठी करता येईल. यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील. त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधान पुढच्या महिन्यात ८ आणि ९ तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. फार मोठा फिनटेक फेस्टिवल होत आहे. यामध्ये जगभरातील या क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान हे दोघेही येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. नवी मुंबईचा विमानतळ, तसेच मेट्रो-३चे उद्घाटन मोदी यावेळी करतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. नवी मुंबईला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशीही माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.