राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडून आता दोन आठवडे उलटले आहेत. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर ८ आमदारांना पदभार मिळाले आहेत. याशिवाय, पुढील निवडणुका एनडीएसह लढवण्याचा मानसही अजित पवार गटाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत यासंदर्भात निश्चित आकडा जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ जुलै रोजी दुपारी अचानक अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात डोळ्यांत पाणी आणून करून शरद पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यायला लावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवारांसह शपथ घेताना राज्यानं पाहिले. शपथविधीनंतर अजित पवारांनी आपल्याला पक्षाच्या बहुतेक आमदारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, नेमका आकडा समोर येत नव्हता.

५ जुलै रोजी झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीतही गटाच्या सर्व नेत्यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतलं. मात्र, याहीवेळी पाठिंबा असणाऱ्या आमदारांचा नेमका आकडा जाहीर झाला नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनीही ४०हून जास्त आमदारांचा पाठिंबा असा मोघम दावा करण्याशिवाय इतर कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे अजित पवारांसह नेमके किती आमदार गेले आहेत? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमका सरकारला किती आमदारांचा पाठिंबा आहे, याचा आकडा जाहीर केला आङे.

रात्री उशीरापर्यंत चालली बैठक!

एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही एनडीएचे घटक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “एनडीएला २५ वर्षं झाली. मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक होती. त्यात ३९ पक्ष सहभागी झाले होते. जे ५०-६० वर्षांत सत्ताधाऱ्यांनी विकासाचे निर्णय घेतले नव्हते, ते ९ वर्षांत घेतले गेले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला २१० आमदारांचा पाठिंबा!

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला २१० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. “महाराष्ट्राच्या वतीने आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे. महाराष्ट्रात २१० आमदारांचं संख्याबळ असणारं सरकार आहे. आजच्या परिस्थितीनुसार लोकसभेच्या ४५हून जास्त जागा निवडून येतील. त्याचबरोबर राज्यात आपण करत असलेल्या विकासकामांमुळे क्लीनस्वीपही होऊ शकतं. तेही अशक्य नाही. देशभरात ३३० हून जास्त जागा निवडून आणण्याचं वातावरण देशात दिसतंय”, असा दावाही शिंदेंनी केला.

“सरकारच्या विरोधासाठी आम्ही विदेशी मदत घेतली नाही”, ‘एनडीए’च्या बैठकीतून मोदींचा हल्लाबोल!

“आपल्या देशाची बदनामी दुसऱ्या देशात करण्याचा एकच अजेंडा असणाऱ्यांना ‘इंडिया’ हे नाव ठेवण्याचा अधिकार नाही. सगळे एकत्र आले. पण एक नेता ठरवू शकले का ते? कारण त्यांची आघाडी स्वार्थासाठी आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, नियत नाही. मोदींवर आरोप करणं, बदनामी करणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे”, अशा शब्दांत शिंदेंनी बंगळुरूत झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on nda meeting in delhi says 210 mla support pmw