Eknath Shinde Speech in Khed Rally: दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याबद्दल कमालीची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!
सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी २०१९ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं? – एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात सर्कशीप्रमाणे त्यांचे जागोजागी शो होणार आहेत. पण तेच टोमणे असतील. खोके आणि गद्दार, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा शब्द आहे का? नाही – एकनाथ शिंदे
गेल्या आठवड्यात याच महिन्यात एक फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार? मुंबईतही सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती – एकनाथ शिंदे
काही लोक ही सभा पाहात असतील. पण पूर्वी झालेली सभा, त्यावेळची गर्दी ही तुलना करायला आम्ही आलेलो नाही – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंच्या सभेतही लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा दाखवला व्हिडीओ
उद्धव ठाकरेंसोबत कुणीतरी नेता येऊन म्हणतो की असं पाडा की रामदास कदमचं कुटुंब पुन्हा उभं राहाता कामा नये. अरे बाबा, तुला मीच आणला, मीच उभा केला, तुला तिकीट मीच दिलं – रामदास कदम
ज्या रामदास कदमनं कोकणात खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली. आणि आमच्यावर खोक्यांचा आरोप लावताना तुम्हाला लाज वाटली नाही का? – रामदास कदम
आमच्याकडे खूप गोष्टी आहेत. कुणाचे हॉटेल श्रीलंकेला, सिंगापूरला, लंडनला आहेत. अमेरिकेत कुणाच्या मालमत्ता आहेत हे एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. खोक्याची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? – रामदास कदम
उद्धवजी, अफजलखानासारखी तुमची इथे यायची हिंमत होणार नाही. हे इथे जमलेले हे लोक सांगतायत – रामदास कदम
२० आमदारांनी उद्धवजींना सांगितलं की राष्ट्रवादी सोडा, आम्ही बाकीच्या २० जणांना घेऊन येतो. तुम्ही त्यांनाही चालते व्हा सांगितलंत. कुठंतरी वर बसलेल्याची भीती ठेवा. खोटं बोल पण रेटून बोल. १९९० सालात माझ्यासमोरच्या उमेदवारासोबत दाऊद होता. त्याला मी घाबरलो नाही, तर तुमच्यासरखे भास्कर जाधवाला घेऊन येणाऱ्याला मी घाबरेल का? – रामदास कदम
गद्दार एपी, उद्धव ठाकरेंचा कलेक्टर. तो १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला यायचा. फक्त योगेश कदमला कसं संपवायचं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते, कटात नव्हतात. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता हलवायला. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे – रामदास कदम
तुम्ही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. पण रामदास कदमला रत्नागिरीत पालकमंत्रीपद दिलं नाही – रामदास कदम
दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे, मला तुम्ही ४ वर्षं भेटला नाहीत. मी तुमचे काय घोडे मारले ते एकदा सांगा ना तुम्ही. मलाही कळू द्या. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे गेल्यानंतर पक्ष संकटात आला, तेव्हा वर्षभर मला गाडीत बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. मी गोळी झेलेन पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही हे मी शिवसेनाप्रमुखांना सांगत होतो. याची परतफेड केलीत का? – रामदास कदम
उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? २००९मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो मी – रामदास कदम
बाळासाहेब असंही म्हणाले होते की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, तेव्हा शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन. बोला उद्धवजी. तुमची सभा केवढी झाली. ही सभा केवढी आहे हे तुम्ही गपचूप लपून बघत असाल. त्या भास्कर जाधवचे कुणी चमचे असतील इथे तर त्यांना म्हणावं जाऊन बघा, सगळी ट्रॅफिक बंद आहे. इथल्यापेक्षाही चार पटीनं लोक बाहेर थांबलेत. शिवाजी पार्कपण कमी पडलं असतं – रामदास कदम
माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही, हे योगेश कदमनं दाखवून दिलं आहे – रामदास कदम
एकनाथ शिंदे झोपतात कधी, उठतात कधी याचं संशोधन सगळीकडे चालू आहे. दिवसरात्र काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत – रामदास कदम
महाराष्ट्रात चालू असलेली पवारशाही आणि उद्धवशाही समूळ नष्ट करा. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवशाही महाराष्ट्रात आणा – गजानन कीर्तीकर
४० आमदार आणि १२ खासदारांनी उठाव केला. सत्तेच्या खुर्चीकडे आकर्षित न होता ते तिकडे गेले. असा एक नेता मिळाल्यानंतर आम्हाला एक संधी मिळाली. स्वत:चं पाप झाकण्यासाठी ते खोके म्हणून वल्गना करतायत. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून शिवसेना नष्ट होणार होती याच्या आम्हाला वेदना होत होत्या – गजानन कीर्तीकर
योगेश कदमांना राजकीय दृष्ट्या कसं संपवायचं हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं, त्या बैठकीला मीदेखील होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला – उदय सामंत
पाच तारखेला ते म्हणाले की माझ्या हातात तुम्हाला द्यायला काहीच नाही. पण एकनाथ शिंदे आज तुम्हाला सगळ्यांना द्यायला आले आहेत – उदय सामंत
पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती. ती विचार देणारी सभा नसून शिवीगाळ करणारी सभा होती. गेल्या ५० वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. ८ महिन्यांपूर्वी शिंदेंनी आम्हाला गुवाहाटीला नेऊन आणलं. ते काही लोकांना इतकं वर्मी लागलंय, की अजून ते बाहेरच आले नाहीयेत – उदय सामंत
अजान सुरू असताना उदय सामंतांनी भाषण काही वेळासाठी थांबवलं…
दापोली मतदारसंघात २०२४ ला कुणाच्या बापाची हिंमत नाही हा भगवा खाली उतरवायची. आम्ही डौलाने हा भगवा फडकवून दाखवू – योगेश कदम
जगात असा कुठला पक्ष नसेल, ज्या पक्षाचा पक्षप्रमुखच त्या पक्षाच्या आमदाराला संपवायला निघाला होता. सहा महिने मला उद्धव ठाकरेंनी भेटायची वेळ दिली नाही. ज्या रामदास कदमांनी बाळासाहेबांचा उजवा हात म्हणून काम केलं, त्या रामदासभाईंच्या मुलाला भेटायची वेळ मिळाली नाही – योगेश कदम
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सत्तेत आल्यानंतर फक्त संभाजीनगर नाव करण्याचा ठराव झाला नाही तर केंद्राची त्याला संमतीही मिळाली. त्यांना कुणीही फसवलेलं नाही. कुणीही पैशांसाठी विकलं गेलेलं नाही. जे काही बोललं जातंय, ते फक्त सहानुभूती मिळवणम्यासाठी. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो, म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळाला – दीपक केसरकर
आज ते आम्हाला नावं ठेवतायत. पण खऱ्या अर्थाने युतीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांपासून आम्ही लांब गेलेलो नाहीये. आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सांगत होतो की आजही तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा – दीपक केसरकर
ही सभा म्हणजे विकासकामांचं उत्तर आहे. अर्थसंकल्पाच मंजूर केलेली कामं लोकांना सांगण्यासाठी ही सभा आहे. त्यांनी घेतलेल्या सभेत कोकणाचा काय विकास करणार हे सांगितलं नाही. कोकणासाठी २ हजार कोटी रुपये पुनर्वसनासाठी मंजूर केले आहेत. त्यांनी काय दिलंय? – भरत गोगावले
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मी भास्कर जाधवला राजकारणातून गाडणार. त्याला विधानसभा पुन्हा बघू देणार नाही हे माझं चॅलेंज आहे – रामदास कदम
—
ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम. ज्यांना मी पराभूत केलंय, ते माझा काय पराभव करणार? खेड-दापोली मतदारसंघात रामदास कदमांनी आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य संपवलं – भास्कर जाधव
५ तारखेला जी सभा झाली, त्यांचे काही नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. हे लोक अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. पण त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेची ही सभा आहे. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. त्यामुळे असा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठतोय. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून असं काही करू नये अशी सूचना मी करतो – उदय सामंत
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!