सोमवारी महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, ज्या जनतेच्या चिंतेत भर घालणाऱ्या ठरल्या. सुरूवातीच्या आठवड्यात वीसच्या घरात असलेली राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर गेली. दुसरी महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र संचारबंदीच्या चौकटीत फेकला गेला. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. सरकार संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार झटत आहे. पण, वाढता आकडा सरकारबरोबरच नागरिकांसमोर मोठं आव्हान उभं करू लागला आहे. पण, मूळ प्रश्न असा आहे की, याची सुरूवात झाली कशी. महाराष्ट्रात करोनाचा विषाणू येण्याला केंद्र सरकारचा एक निकष कारणीभूत ठरला. त्यामुळे महाराष्ट्रावर आजची स्थिती ओढवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनमध्ये करोनाचा (कोव्हिड-१९) उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र फक्त त्यावर चर्चा सुरू झाली. मात्र, हवाई वाहतूक सुरूच होती. त्यामुळे हा विषाणू पर्यटन आणि इतर कारणास्तव चीनमधून परतणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून इतर देशात पोहोचला. भारतात आधी केरळमध्ये करोनाग्रस्त रुग्ण सापडले. तोपर्यंत देशाच्या इतर भागात कुठेही करोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. दरम्यान, १० मार्चला धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले अन् खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याची व्यवस्था विमानतळांवर करण्यात आली. मात्र, सुरूवातीला करोनाग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांचीच तपासणी करण्यात येत होती. केंद्र सरकारनं तयार केलेल्या या यादीमध्ये दुबईचं नावच नव्हतं. त्यामुळे दुबईतून येणाऱ्या नागरिकांची तपासणीच करण्यात येत नव्हती. याच काळात अचानक पुण्यातील दोघांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली. त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

दुबई आणि एक ट्रिप …

दोन रुग्ण आढळून आल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं होतं की, ‘४० लोकांचा एक ग्रुप दुबईमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यामध्ये पुण्यातील दाम्पत्य होतं. ते १ मार्च रोजी भारतात परतले. दुबई करोना बाधित शहरांच्या यादीत नाही. त्यामुळे मायदेशी परतल्यानंतर त्यांचं अलगीकरण करण्यात आलं नाही. नंतर करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अहवालात त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि पुण्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला.’ इथेच ही चूक घडली. सरकारनं परदेशातून येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असता. तर करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात येण्यापूर्वीच निर्दशनास आले असते अन् आता निर्माण झालेला धोका टाळता आला असता.

आता पुढे काय?

प्रचंड वर्दळ असलेली मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहर करोनाच्या रडावर आली. लोकांच्या गर्दीनं वाहणारे रस्ते आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. पण, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. नंतर लॉकडाउनच्या दिशेनं राज्य सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली. हळूहळू एक सेवा बंद करत, रविवारी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही बंद करण्यात आली. देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. त्यानंतर सरकारनं जमावबंदी आदेश लागू केले. पण, नागरिक गांभीर्यानं घेत नसल्यानं अखेर सोमवारी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. आता पुढे हे निर्बध आणखी कडक केले जाऊ शकतात. विशेषतः जोपर्यंत करोनाचा संसर्ग रोखण्यात सरकारला यश येत नाही, तोपर्यंत संचारबंदीला मुदतवाढ दिली जाऊ शकते. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या बोलण्यातून तसे संकेत देत आले आहेत. राज्यातील जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले, तरी घेऊ, असं ते वारंवार सांगत आहेत. त्यामुळे करोना प्रार्दूभाव थांबल्याशिवाय महाराष्ट्र पूर्वपदावर येण्याची चिन्ह कमी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in maharashtra central govt rule about testing of foreign traveller bmh