Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाचा आज मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. उद्धव ठाकरे यांची मागील दहा भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासाबद्दलचं एक वाक्य दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा असं म्हणत जोरदार टीका केली. तसेच २०१९ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींचा दाखल देत अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“गेल्यावेळी महापालिकेत आपण थोडक्याने राहिलो होतो. दोन कमी पडले होते. कमी असल्यानंतर काय करायचं? हे आपल्याला माहिती आहे. आपण गणित जमवलं होतं. त्यावेळी भाजपाचा महापौर महापालिकेत बसवण्याची वेळ आली होती. मात्र, आजही आठवतं की मला तेव्हा फोन आला आणि शिवसेनेचा महापौर व्हावा अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती असं सांगितलं. त्यानंतर आपण एका क्षणाचाही विलंब लावला नाही.”
“तेव्हा मी सर्व सहकाऱ्यांना बोलावलं आणि विचारलं की काय करायचं? तेव्हा सर्वांनी म्हटलं की ठिक आहे आपण एक पाऊल मागे घेऊ आणि महापौर देऊ. त्यानंतर आम्ही ठरवलं की महापौर, उपमहापौर, स्थायी समिती असं सर्व तुम्ही घ्या. आम्ही महापालिकेत अंकुश म्हणून काम करू. तेव्हा आपण मन मोठं दाखवलं आणि म्हटलं की मित्रासाठी कधी बलिदानही करावं लागतं. पण २०१९ ची विधानसभेची निवडणूक झाली आणि मला गाणं म्हणावं लागलं अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
‘मुंबईच्या जनतेने उत्तर दिलं’
“काही उचक्के दररोज सकाळी उठून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतात. मात्र, अशा उचक्क्यांना मुंबईच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर दिलं आहे. मुंबई कोणाची? याचं उत्तर सातत्याने २०१४, २०१९, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांनी दिलेलं आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही महायुतीची आहे हे उत्तर दिलं.”
‘विकासाबद्दलचं वाक्य दाखवा आणि १०० रुपये घेऊन जा’
“आज तुम्ही यांची (उद्धव ठाकरे) भाषणं पाहा. काय बोलतात? यांच्या भाषणांमध्ये, मी तर तुम्हाला १०० रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांची (उद्धव ठाकरे) मागची १० भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासावर एक वाक्य दाखवा. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य तुम्ही मला दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा. ते विकासावर बोलत नाहीत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’ : फडणवीस
“खरं म्हणजे काही लोक आपलं हसू करून घेतात. साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं की कशाला पक्षावर लढायचं? मात्र, काहीजण म्हणाले की आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. आमच्या शंशाक राव आणि प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.