सांगली : विकासाच्या नावाखाली चंगळवाद वाढल्यामुळेच समाजातील अनेक घटकांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. यातून समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून, सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एवढेच नव्हे तर समाजात टिकाऊपणा वाढण्याऐवजी दिखाऊपणा वाढला आहे, ही बाब चिंताजनक असून, समाजाच्या विकासासाठी घातक आहे. संवेदनशील समाजालाच खरे भवितव्य आहे, असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

सांगली येथील राज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने कृषिभूषण दादासाहेब ठिगळे यांच्या स्मरणार्थ प्रा. जोशी यांचे ‘साहित्य, समाज आणि संवेदना’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर होत्या. याप्रसंगी प्रा. जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समीक्षक प्रा. अविनाश सप्रे, महेश कराडकर व ऋतुराज ठिगळे यांचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली येथील ज्ञानदीप वाचनालयास पुस्तके व निधी भेट देण्यात आला.

प्रा. जोशी म्हणाले, की समाजाला संवेदनशील साहित्यिक व विचारवंतांची गरज आहे. त्यांच्या संवेदना अधिक बोथट झाल्या तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही. त्यामुळे संवेदनशील माणूस निर्माण होईल, अशी व्यवस्था तयार करावी लागणार आहे. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या की, भाषा ही माणसाला जोडण्याचे कार्य करते. संस्कृती ही नदीसारखी वाहती असली पाहिजे, त्याशिवाय समाजाचा खरा विकास होणार नाही. माणूस हा विकासाच्या नावाखाली निसर्गापासून आणि मातीपासून दूर चालला आहे, हे समाजाच्या दृष्टीने हिताचे नाही.

स्वागत करताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने ग्रामीण विकास संस्था स्थापन केली आहे. कार्यक्रमास प्रा. शामराव अण्णा पाटील, शिवराज काटकर, गौतमीपुत्र कांबळे, दि.बा. पाटील, अंजुमन खान, धनंजय जोशी, डॉ. अनिल मडके, मालन मोहिते, डॉ. डी. जी. कणसे त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी तर राजेश ठिगळे यांनी आभार मानले.