शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. केंद्राने घाईनेच लॉकडाउन केला असं आता म्हटलं जातं आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा शिवसेनेच्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले फडणवीस?
“शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचंच काम केलं. बरं एका भूमिकेवर ते ठाम राहिले तर ठीक होतं. पण रोज भूमिका बदलयाची हे त्यांचं धोरण. एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावं ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असं शिवसेनेचं धोरण आहे त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही. आज राज्यात करोनाची स्थिती वाईट होत चालली आहे. मात्र जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नाहीत. देशाच्या आधी लॉकडाउन पुकारला तो महाराष्ट्राने. मग लॉकडाउनची घाई कुणी केली? देश आम्हाला फॉलो करतो आहे अशा जाहिराती तेव्हा केल्या आणि आता यांना त्याचा विसर पडला त्यामुळे केंद्राने लॉकडाउन करताना घाई केली अशी ओरड केली जाते आहे” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- “सांगतो ते करतो का, याचा ठाकरे सरकारकडून विचार करणं आवश्यक”
एवढंच नाही तर खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत वगैरे याही फक्त घोषणा आहेत. श्रमिक जेव्हा ट्रेन सुरु केल्या गेल्या नव्हत्या आणि पायी चालले होते तेव्हा आपल्या डोक्यावरचं संकट टळलं हे या सरकारचं धोरण होतं. श्रमिकांची काळजी त्यावेळी घेतली गेली नाही. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीतही मी त्यांना सल्ला दिला होता की जे पायी जाणारे श्रमिक आहेत त्यांना थांबवा. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपये मदत तोकडी ठरेल – देवेंद्र फडणवीस
तीन पक्षांच्या सरकारला पॉलिसी पॅरेलेसिस झाला आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले “तीन पक्षांच्या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तीन पक्षांच्या एकमेकांमध्ये समन्वय नाही. तसंच या तीन पक्षांचा अधिकाऱ्यांशीही समन्वय नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला पॉलिसी पॅरेलेसिस तर झाला आहेच पण या सरकारला अॅक्शन पॅरेलेसिसही झाला आहे”
