सांगली : शिराळा तालुक्यातील मणदूर खालील धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकर्‍यांच्या ५७ वर्षापासून असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळवून दिला आहे. येथील दोनशे एकर जमीन कब्जे हक्काने सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या नावावर तातडीने (दहा दिवसात) करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीस यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक व युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार श्री. नाईक म्हणाले, धनगरवाडा, विनोबाग्राम येथील गट नं. २२१ व २२२ मधील २०० एकर जमिन आहे. ही जमिन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने २५ नोव्हेंबर १९६६ रोजी निर्वनीकरण करून विनोबाग्राम सहकारी सोसायटीच्या नावे कसण्यासाठी दिली होती. १९७५ साली सदर सोसायटी अवसायनात निघाली. त्यावेळी सदरची जमीन शासनाकडे जमा करण्यात आली. मध्यंतरी या जमिनीवर वन विभागाचे नाव लागले होते. ही जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत होती. धनगरवाडा येथे ६९ कुटुंबे तर ३१५ लोकसंख्या तर, विनोबाग्राम येथे १५ कुटुंबात ५५ लोकसंख्या आहे.

हेही वाचा : Koyna Dam: कोयनेचे दरवाजे दीड फुटांवर, पाणलोटात १२.३० इंच पाऊस; सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर

आमदार श्री. नाईक म्हणाले, सर्व वस्तूस्थिती, शेतकरी, ग्रामस्थांची मागणीबाबत माहिती समजून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित मंत्री व अधिकार्‍यांशी चर्चा करून सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने सदर जमिन त्यांच्या नावावर करावी. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दहा दिवसात करावी, असे आदेश दिले. त्यामुळे धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकरी, ग्रामस्थांचा ५७ वर्षापासून सुरू असलेला संघर्ष व मागणीस यश मिळाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli dhangarwada and vinobagram farmers land dispute solved after 57 years by dcm ajit pawar css