वाई : पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने कोयना (शिव सागर) जलाशयात देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या जल पर्यटनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यातील मुनावळे (ता. जावली) येथे करण्यात आला. मुख्यमंत्री आज साताऱ्यातील मौजे दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर), मुनावळेच्या (ता. जावली) दौऱ्यावर होते. यावेळी कोयना (शिव सागर) जलाशय तीरावर पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुनावळे (ता. जावली) येथे झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराजे देसाई, अभिनेते नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री म्हणाले, कोयना (शिव सागर ) जलाशयातील अधिकृत गुप्त कायदा (ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट )काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य आहे. याचबरोबर मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘तेव्हा गुवाहाटीसाठी भास्कर जाधवदेखील बॅग भरून..’, आमदार योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

जल पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल आणि स्थानिकांना रोजगारास वाव मिळेल. स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. एक लाख ३७ हजार कोटींचे प्रकल्पांचे दाओस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. तीन लाख ९३ हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. पाच लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : Video: “हल्ली कोण कुठंय हेच कळत नाही”, राज ठाकरेंची खोचक टीका; राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेऊन म्हणाले, “परवा नाट्यसंमेलनात…”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले,राजेंद्र जाधव, सरपंच श्री. भोसले, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब (ता महाबळेश्वर) येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara cm eknath shinde inauguration of koyna water tourism css