ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १२ श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या मृत्यूप्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासघरमधील कार्यक्रम भर दुपारी घेतल्यामुळेच उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातून त्यांचा मृत्यू ओढवल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच, कार्यक्रमाची वेळ निवडण्यातच आयोजकांनी आणि सरकारने चूक केल्याचंही सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महिला व बालविकास मंत्री मगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना याची माहिती दिली आहे.

काय आहे निर्णय?

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

धक्कादायक! २०१८ नंतरची ३७ टक्के ईव्हीएम आढळली सदोष, केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

“खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतलाय. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी याचं पालन करायला पाहिजे”, असं मंगलप्रभात लोढा निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharghar heatstroke incident maharashtra bhushan award mangalprabhat lodha decision pmw