नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. किरीट सोमय्या हा नालायक माणूस असून त्यांच्या आरोपांना फारसं महत्त्व देत नाही, असं विधान सावंतांनी केलं. तसेच सोमय्या यापूर्वी भाजपा नेते नारायण राणे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करायचे, आता ते गप्प का आहेत? असा सवाल सावंतांनी विचारला.

हेही वाचा- “एकाच्या छातीत गोळ्या घुसल्या तरीही…”, भाजपा-शिंदे गटातील नेत्यांच्या वादावर आव्हाडांचं मोठं विधान!

सावंतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार आणि सत्ताधारी पक्षातील नेते प्रताप सरनाईकांच्या घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या ५० टक्के भागीदारी विधान सोमय्यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “किरीट सोमय्या नालायक माणूस, त्याला तुम्ही…”, अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, “प्रताप सरनाईकांनी जो गुन्हा केला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी घोषित केलं होतं की, प्रताप सरनाईक निर्दोष आहेत. मग त्या घोटाळ्यात उद्धव ठाकरेंची ५० टक्के भागीदारी होती का? असं असेल तर अरविंद सावंतांनी तसं एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावं. उद्धव ठाकरे आणि प्रताप सरानाईकांनी घोटाळा केला आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी प्रत मला मिळाल्यास मी निश्चित पाठपुरावा करणार…” असं विधान सोमय्यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya fresh allegation on uddhav thackeray and pratap sarnaik scam rmm