Maharashtra Political News Today : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इतर बातम्यांवरही आपले लक्ष असणार आहे.
Maharashtra Political News Update : महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने बिकट स्थिती
मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सह्यांद्री अतिथी गृहावर दुपारी १ वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्याच्या पाणीप्रश्नावर काढलेली पदयात्रा नागपूरच्या वेशीवर पोहोचली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच, स्वत: नितीन देशमुख यांनीही सरकारवर परखड शब्दांत टीका केली. या मुद्द्यावरून राजकारण रंगत असताना ठाकरे गटानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. श्रीसेवकाच्या मृत्यूचा आकडा ५०च्यावर गेला असून श्रीसेवकांना पैसे देऊन शांत केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांनंतर आता शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत मोठा धक्का दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सविस्तर वाचा
खारघरमध्ये उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत होता. त्यापार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत होती. त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना आजपासून ( २१ एप्रिल ) सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा
पावसाळय़ापूर्वी महामुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यानंतर या सर्वच प्राधिकरणांनी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्याचा फटका आता बसू लागला असून या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. महामुंबईत दुपारी अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.