मराठवाड्यासह पश्चिम विदर्भ आणि सोलापूर तसंच उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे या ठिकाणी पावसाचं जोरदार थैमान सुरु आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये अशी स्थिती आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती असल्यासारखा पाऊस दिवसरात्र कोसळतो आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच आठवड्यात मराठवाड्याचा दौरा केला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना अधिकारी वर्गाला केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे आठ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे १५० मि.मी. पावसामुळे १,२५,००० क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.

  • माजलगाव धरणातून ४१,७०१ क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. हा पूर्वी ९५,००० क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आला आहे.
  • धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून ७५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. काही ठिकाणाहून तो ६० हजार क्युसेक इतकाच आहे.
  • उजनीमधून १ लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावासाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. हेक्टरी ५० हजार रुपये इतकी मदत राज्य सरकारने करावी अशी मागणी उद्धव ठाकरे, जयंत पाटील, राज ठाकरे या सगळ्या नेत्यांनी केली आहे.

२७ तारखेला समोर आलेल्या माहितीनुसार माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे ११ दरवाजे उघडत ४२००० प्रतिसेकंद घनफूट वेगाने विसर्ग केला जात आहे. केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडत नदीपात्रात २७१६६ प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती इतर भागांमध्येही आहे.