विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांची नाराजी दूर झाली आहे. आज नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमच्यात कोणताही वाद नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख, मुंबईतील बॅनर्समुळे चर्चेला उधाण!

“नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसमध्ये वाद असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अगोदरच सांगितले होते, की आमच्यात कोणताही वाद नाही. बाळासाहेब थोरात यांनीदेखील सांगितले होते, की आमच्यात वाद नाही. वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फोल ठरलेला आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकू,” असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कथित नाराजीवर बाळासाहेब थोरातांचे थेट भाष्य, म्हणाले “अरे अरे अरे, मी…”

मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही

दरम्यान, नाना पटोले यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेण्याअगोदर बाळासाहेब थोरात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसमधील वाद आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य केले. “अरे अरे अरे…मी नाराज होतो, हे कोणी सांगितले. मला माध्यमांकडूनच समजत आहे की मी नाराज होतो. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो. तो मीदेखील केला,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole clarifies no clash in congress press conference with balasaheb thorat prd