Sunil Tatkare : शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीची चर्चा जोर धरत असताना आता राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गाठीभेटी आणि दोन्ही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून विभक्त झालेले राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एक होणार अशा चर्चेला जोर धरला आहे. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचंही म्हटलं जातंय. यावर सुनील तटकरे यांनीच खुलासा केला आहे. ते एपीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
वर्धापन दिन पुण्यात करण्याचं का ठरवलं?
“छगन भुजबळांचा शपथविधी होण्याआधी म्हणजे महिनाभर आम्ही एकत्र बसलो होतो. तेव्हाच वर्धापन दिन पुण्यात घेण्याचं ठरवलं. मुंबईत मराठी भाषा गौरव दिन, महाराष्ट्र दिन साजरा केला. त्यामुळे पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात करण्याचं ठरवलं”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा राष्ट्रवादीच्या कोअर ग्रुपपुढे कधीच आली नाही. राष्ट्रवादीने २०१४ मध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत वेळोवेळी चर्चा झाली. ही चर्चा एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचलीही. पण ती चर्चा कार्यान्वित झाली नाही. त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली सामूहिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला अनेकांची साथ मिळाली. त्यातून आम्ही एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
सुनील तटकरेंचा विरोध?
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यास अजित पवारांच्या गटातील एका फळीकडून विरोध आहे, असं म्हटलं जातंय, असं सुनील तटकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर सुनील तटकरे म्हणाले, “ही सुद्धा उठवलेली अफवा आहे. जी चर्चाच आमच्यापर्यंत आली नाही, त्याला विरोध करण्याचं कारणच काय?”
© IE Online Media Services (P) Ltd