मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना ते म्हणाले की, मराठा हा कधीच जातीयवादी नव्हता. मराठा समाज जातीयवादी असता तर या महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, वसंतराव नाईक, मनोहर जोशी कधी मुख्यंमत्री होऊ शकले नसते. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होऊ शकले नसते. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी दोनदा खासदार होऊ शकली नसती, पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे आमदार होऊ शकले नसते. अशी शेकडो उदाहरणे देता येतील, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मराठा समाज हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. मराठा समाजानेच तुम्हाला राजसत्तेवर बसवले. पण त्याच राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा तुम्ही गैरवापर केला. मराठ्यांच्या मुलांवर केसेस केल्या, एसआयटी नेमून त्रास दिला. माझ्या कुटुंबियांवरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला. ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही. मी आणि माझे कुटुंब जरी डावावर लागले असले तरी मी सरकारला ऐकणारा नाही. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार नाही.”

मनोज जरांगे पाटील यांना तडीपार करणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

माझी निष्ठा विकत घेता येत नाही म्हणून हल्ल्याचा डाव

मी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. यापुढे मी धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या जाती एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल, अशी भीती काहींना वाटते. माझा प्रामाणिक विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

गृहमंत्री फडणवीस हुकूमशहा

हा खळबळजनक दावा करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. “गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे. कारण मी त्यांचे ऐकत नाही. ते हुकूमशहा आहेत. त्यांना वाटतं ते म्हणतील तसंच व्हावं, नाहीतर ते तुरुंगात टाकतील. मी मागेही याबाबत बोललो होतो. माझ्याविरोधात एसआयटी स्थापन करणे, खोटे व्हिडीओ बनवणे, माझ्याविरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसविणे, त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे, असले प्रयोग करून झाले आहेत”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आपल्या कुटुंबावर हल्ला होणार हे तुम्हाला कसं समजलं? असा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगू शकत नाही. पण ही माहिती देणारे गृहमंत्र्यांच्याच आजूबाजूचे आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plot to attack my family sensational claim by manoj jarange patil kvg