कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची मागणी महाराष्ट्रातील कोणीही  केली नसल्याने त्याचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलावा असा प्रश्न करून, हे सारे मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्ष मजबुतीने चालावा अशी आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेस सोडण्याची चर्चा फेटाळली. कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, आरएसएस व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Vedanta Foxconn गुजरातला गेल्याप्रकरणी ठाकरे सरकारला दोषी ठरवणाऱ्या शिंदे- सामंतांना शरद पवारांचा टोला; म्हणाले, “हे शहाणपणाचं…”

हेही वाचा : “गप्प बसा, आम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नारायण राणेंचं प्रत्युत्तर!

वेदान्त-फॉक्सकॉन हा एक लक्ष ५४ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे निश्चित होते. तळेगावला जागाही दिली गेली होती. राज्य सरकारने सर्व प्रकारच्या सवलती, सहकार्यही दिले होते. मात्र, अचानक चक्रे फिरली. आणि पंतप्रधान मोदींच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरातला नेला. राज्यातील डबल इंजिन सरकारची ही किंमत राज्याला मोजावी लागली. केवळ मोदींचा हट्ट असलेल्या बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील अतिशय मोक्याची हजारो कोटींची जागा लागणार आहे. तेथे नवे उद्योग, प्रकल्प येणार नाहीत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुंबईचे महत्व कमी करायचे हा आहे. तरी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांनी आपल्या वित्तीय सेवा अहमदाबादला गेल्याने मुंबईकरांचा काय फायदा झाला? हे सांगावे असा टोला पृथ्वीराजांनी लगावला.

हेही वाचा : “हे रात्री बावचळून उठतात, खोकं..”, अजित पवारांची एकनाथ शिंदे गटावर टोलेबाजी!

भाजपची काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा असून, विरोधक संपवायचे म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याला अडथळाच राहणार नसल्याचा त्यांचा अजेंडा आहे. विरोधी पक्ष व लोकशाहीही संपवायला निघालेल्या भाजपला काँग्रेसच ठामपणे विरोध करू शकते. तरी, काँग्रेस बळकटीसाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. पण, मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पसरवल्या? असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याबाबत सोनिया गांधी यांचे आभार मानले. आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे पृथ्वीराजांनी स्पष्ट केले. गुलामनबी आझाद यांच्या समवेत दीर्घकाळ काम केले असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीचा आझाद यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याचा अर्थ होत नसल्याचे चव्हाण म्हणाले. गोव्यातील काँग्रेसमधील फुट दुर्दैवी असून, देशात अशी फुट पाडण्याचा नीती राबवली जात असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi misled vedanta foxconn gujarat criticism former chief minister prithviraj chavan ysh