​सावंतवाडी: ​महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका नीरजा यांची सन्माननीय निवड करण्यात आली आहे.

​या संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार आहे. हे संमेलन येत्या २८ डिसेंबर रोजी येथील आरपीडी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत सभामंडपात साजरे होईल. संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रा. प्रवीण बांदेकर यांनी ही घोषणा केली.

​अध्यक्षा नीरजा यांचा परिचय:

​कवयित्री नीरजा यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ इत्यादी सहा कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. कथासंग्रह (उदा. ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसे’) आणि ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ ही कादंबरी यासह अनेक ललित लेख संग्रह आणि संपादने असे त्यांचे साहित्य विपुल आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

​उद्‌घाटक डॉ. लवटे यांचा परिचय:

​संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘खाली जमीन वर आकाश’ हे आत्मचरित्र विशेष गाजले आहे. शिरोडा व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांच्या स्मृती जतन करणारी भव्य दालने उभारण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यांनी खांडेकरांचे ‘वैनतेय’ साप्ताहिकातील लेखन संपादित करून त्याचे चार खंड प्रकाशित केले आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाचे दहा खंड देखील संपादित केले आहेत.

​संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या आणि संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या बैठकीला प्रा. प्रवीण बांदेकर, सतीश लळित, उषा परब, गोविंद काजरेकर यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, सुमेधा धुरी, कल्पना बांदेकर, विजय ठाकर, वाय. पी. नाईक, मंजिरी मुंडले, विनया बाड, पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, विजय देसाई, राजू तावडे, रूपेश पाटील आणि जिल्हाभरातील अनेक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.