मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येतील का? याविषयी एप्रिल महिन्यात चर्चा रंगल्या होत्या. या राजकीय नाट्याचा पुढचा अंक येण्याआधीच प्रकाश महाजन यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. संजय राऊत यांना त्यांनी खडे बोल सुनावत एक आरोपही केला आहे.

राज ठाकरेंनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.” असं राज ठाकरे म्हणाले होते. २० एप्रिलला ही मुलाखत समोर आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? यावर प्रकाश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले प्रकाश महाजन?

“मला एका उर्दू गझलची ओळ आठवते आहे. तू ने एक बात कही लाखो फसाने निकले. राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत देताना एक ते दोन वाक्यं बोलले. त्यावर लोकांनी स्वप्नं बघायला सुरुवात केली. संजय राऊतसारखे लोक तर आम्हाला त्यांचे बटिक समजू लागले आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही. या आमच्या अटी आहेत, त्या अटी आहेत. खरं तर संजय राऊतला समजलं पाहिजे की राज ठाकरे हे कुठल्याही अटीत किंवा चौकटीत बसणारी व्यक्ती नाही. महाराष्ट्र द्रोही लोकांशी संबंध ठेवू नका म्हणत आहेत. ते ठरवणार कोण?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

संजय राऊत आम्हाला नैतिकता कशी शिकवतात?

“संजय राऊत म्हणातात, तुम्ही अनैतिक संबंध ठेवू नका, ज्या संजय राऊतांनी चंचल स्वभावाच्या उद्धव ठाकरेंना राजकीय व्याभिचार करायला लावला. त्या संजय राऊतने आम्हाला नैतिक अनैतिकतेच्या गोष्टी सांगाव्या का? संजय राऊतने आम्हाला नैतिकता शिकवली पाहिजे का? राज ठाकरे जो निर्णय घेतील तो कार्यकर्ते मानतील. निर्णय राज ठाकरे घेतील. त्यांनी काय निर्णय घ्यायचा याचा सल्ला मी त्यांना जाहीरपणे देऊ शकत नाही. संजय राऊत ज्या पद्धतीने वक्तव्य करतात ती एकत्र येण्याची वक्तव्य आहेत का? दोन भाऊ ठरवतील की काय करायचं. काही वेळा अशा लोकांमुळेही संबंधात दुरावा येतो. जी गोष्ट जुळत आली वाटतं ती फिस्कटून जाऊ शकते” असं प्रकाश महाजन म्हणाले.