Sanjay Raut: २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. पाच ते सहा अतिरेक्यांनी सदर हल्ला केल्याचे सांगितले जाते. यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. मात्र महिन्याभरानंतरही पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांची माहिती मिळालेली नाही. या घटनेवर आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत यांना आज माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाला लक्ष्य करत केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले, “एकेदिवशी ते सहा अतिरेकी भाजपात सामील झाल्याची प्रेस नोट निघू शकते. म्हणूनच ते आतापर्यंत पकडले गेले नसतील.” संजय राऊत यांच्या विधानावर भाजपाच्या नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

ऑपरेशन सिंदूरचे राजकारण

संजय राऊत पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचा राजकीय वापर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेत आहेत. सैन्यदलाचे श्रेय पळविण्याच्या स्पर्धेत पंतप्रधान मोदी सर्वात पुढे दिसत आहेत.

म्हणून राज ठाकरेंनी माझे पुस्तक वाचावे

संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदे यांना पाठवून दिली आहे. तसेच हे पुस्तक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच या पुस्तकाची एक प्रत त्यांनी राज ठाकरेंनाही पाठवून दिली आहे. राज ठाकरेंनी सदर पुस्तक का वाचावे? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.

यावर संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. तसेच राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता. त्यातून ते बाहेर पडले. किणी प्रकरणात सीबीआयने राज ठाकरेंना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. आता काही व्यवहारासंदर्भात ईडीने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा छळ सहन करावा लागला आहे, त्या सर्वांनी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.