Sanjay Raut : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होतं, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी प्रसारमध्यमांशी बोलत होते. याच मुद्द्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना चर्चेत

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. महाराष्ट्रात महायुतीचे १७ खासदारच निवडले गेले. त्यानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली होती. लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरु करण्यात आली होती. ही योजना निवडणुकीपुरतीच आहे अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र ही योजना बंद होणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींना मदत करणारच अशी भूमिका सरकारने घेतली होती. ज्यानुसार ही योजना अजूनही सुरु आहे. दरम्यान अजित पवारांनी जी कबुली दिली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे-संजय राऊत

लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असतील तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून राजीनामा दिला पाहिजे. अर्थखात्यातून घोटाळा झाला आहे. या राज्याचे पैसे लुटले कुणी? लाडक्या बहिणींनी नाही तर लाडकी भावांनी नावं बदलून हा लाभ घेतला आहे. शेकडो कोटी रुपयांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला, तुम्ही छाननी केली नाहीत कारण तेव्हा तुम्हाला मतं हवी होती. अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली. याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

या राज्यातल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांविषयी किती गांभीर्य आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती गांभीर्य आहे? याबाबत त्यांनी चिंतन बैठक घेतली पाहिजे. मला सांगा एकनाथ शिंदे यांना राज्याच्या कुठल्या प्रश्नावर किती गांभीर्य आहे? राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर किंवा समस्यांवर त्यांनी काम केलं आहे? टेंडर काढणं, ठेकेदारांकडून पैसे घेणं आणि पक्ष फोडणं, माणसं फोडणं हेच चाललं आहे. एकनाथ शिंदेंप्रमाणेच अजित पवारही हेच करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हेच करत आहेत. राज्याला प्रतिष्ठा कोण प्राप्त करु देणार? मुख्यमंत्री लग्न सोहळ्यात आहेत. आधी कुंभमेळ्याच्या बैठका झाल्या आता लग्न सोहळे होतील असा टोला संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut demand about ajit pawar resign what did he say about ladki bahin yojana scj