घोषणाबाजी, पोस्टरबाजी, हाणामारी, गुन्हे, आरोप प्रत्यारोप हे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गोष्टी आहेत. अर्थात या चर्चांना कारण आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक व सुटका प्रकरणानंतर सलग तिसऱ्या दिवशीही शिवसेना विरुद्ध राणे हा शाब्दिक संघर्ष सुरु आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी भाष्य करताना राणेंवर टीका केली. मात्र यावेळेस एका प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी राणे हे शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य केलं आहे. आधी राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली आणि पत्रकारांचा निरोप घेताना हे वक्तव्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> राऊतांनी भाजपामध्ये बाहेरुन आलेल्यांची बांगलादेशींशी केली तुलना, म्हणाले…

आधी बाहेरुन आलेले म्हणत टीका…

पत्रकारांशी संवाद साधताना आधी राऊत यांनी राणेंवर भाजपामध्ये बाहेरुन आलेले नेते असं म्हणत निशाणा साधाला. बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना भाजपामधील संबंध बिघडवल्याची टीकाही राऊत यांनी केली. यापूर्वी कधीच शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहितीय. मात्र ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोक चिखलफेक करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

नक्की वाचा >> छत्रपती संभाजी महाराजांशी राणेंशी तुलना : संजय राऊत म्हणाले, “भिडेंना या असल्या…”

शिवसेना-भाजपा एकत्र येणार का?

हा संवाद संपत आला असतानाच एका पत्रकाराने संजय राऊत यांना शिवसेना-भाजपा एकत्र येणार का?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर राऊत यांनी उपरोधिक पद्धतीने टीका केली. “नारायण राणे एकत्र आणण्याचे प्रयत्न करताताय, संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतायत,” असं म्हणत राऊत यांनी संवाद संपवला. तसेच जन आशीर्वाद यात्रेबद्दल मोदींनी असं नाही सांगितलं की माहाराष्ट्रात जाऊन शिवसेनेवर चिखलफेक करा. हे मोदींचे आदेश नाहीत. ते (नारायण राणे) पंतप्रधानांचे आदेशही पाळत नाहीत, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> नितेश राणेंनी फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘एक आठवण’

केंद्रीय संस्थांवर निशाणा…

तसेच राऊत यांनी ईडी आणि सीबीआयसारख्या संस्था या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड पश्चिम बंगालमध्ये वेगाने काम करत असल्याचाही टोला लगावला. इतर राज्यांमध्ये काही घडत नाही अशी गोष्ट नाहीय तिथे आमच्यापेक्षा भयंकर गोष्टी घडतात पण या संस्था कोणाच्या मागे लागतात तर महाराष्ट्रातील अनिल देशमुख असो किंवा आमचे सहकारी सरनाईक यांच्या, असं म्हणत राऊतांनी केंद्रीय संस्थांवर टीका केली. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, माझ्याकडे १०० नावं तयार आहेत मी देतो यादी कोणाला नोटीसा पाठवायच्या याची असं म्हणत ईडीचे माजी प्रमुख अधिकारी भाजपामध्ये सहभागी होतात. तुम्ही इडीत बसून भाजपाच चालवत होता ना?, असा टोलाही लगावला.

नक्की वाचा >> ‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ म्हणत निलेश राणेंनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

त्या पत्रांचा आम्हाला फरक पडत नाही…

आम्ही टीका करतो आणि सहनही करतो. टीकेला धार असली तरी ती स्वीकारतो. पण कंबरेखालचे वार कराल तर कंबरेखाली तुम्ही सुद्धा आहात हे लक्षात ठेवा. भाषेची बरोबरी करु नका, असा इशारा राऊत यांनी राणेंना दिलाय. तसेच भाजपाने मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन कितवा होता हे लक्षात रहावं म्हणून ७५ हजार पत्र पाठवण्याचा निर्णय घेतल्यासंदर्भात बोलताना, ७५ हजार पत्रांचा आम्हाला काही फरक पडत नाही, असं राऊत म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut satirical comment on narayan rane when ask if shivsena bjp will come together scsg