![raj thackeray](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/raj-thackeray-11.jpg?w=310&h=174&crop=1)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जन्म १० एप्रिल १९६२ रोजी मुंबईत झाला. सध्या भाजपात असलेले राणे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळविला. दोन वेळा खासदार असलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत यांचा त्यांनी पराभव केला. त्याआधी त्यांनी राज्यसभेचे सदस्य असताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये त्यांनी अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले होते.
चेंबूरमध्ये शिवसेनेचे शाखाध्यक्ष म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे नारायण राणे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जात होते. २००५ साली पक्षाअंतर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार अशा विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. विधानपरिषदेचे आमदार असताना राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षही सोडला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पुढे १५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला.
नारायण राणे यांना निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अशी दोन मुले आहेत. निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार असून आता ते भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. तर नितेश राणे कणकवली विधानसभेतून भाजपाचे आमदार आहेत. २४ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्याबद्दल अटक करण्यात आली होती.