मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदासंघावरून शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हा वाद टोकाला गेला आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं थेट हल्लाबोल रामदास कदमांनी गजानन कीर्तिकरांवर केला होता. याला गजानन कीर्तिकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास कदम नक्की काय म्हणाले होते?

“गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात आहे. फक्त लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. पण, एकाच कार्यालयात मुलगा आणि वडील बसतात. काय करताय हे सर्व जग पाहतेय. मुलगा ठाकरे गटातून तर तुम्ही शिंदे गटातून अर्ज दाखल कराल. नंतर मुलाला बिनविरोध निवडून द्यायचं, असं कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, ही विनंती आहे,” असं रामदास कदमांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “भाजपाकडून सापत्न वागणूक”, गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मला पाडण्यासाठी रामदास कदमांनी प्रयत्न केले”

यावर एक परिपत्रक काढत गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना लक्ष्य केलं आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले, “रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले.”

“सदानंद कदमांना निवडून आणू नका म्हणून रामदास कदमांची कार्यकर्त्यांना दमबाजी”

“खेड-भरणा नाका ते भोर-पुणे शरद पवार यांच्‍या गाडीत बसून रामदास कदम राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत. एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्‍या वॉर्डामधून त्‍यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका म्‍हणून सर्व कार्यकर्त्‍यांना रामदास कदम हे दमबाजी करीत होते,” असा गौप्यस्फोटही कीर्तिकरांनी केला आहे.

हेही वाचा : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटात वाद उफाळला, गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना सुनावलं

“…म्हणून अनंत गीते विजयी झाले”

“अनंत गीते यांना देखील २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली. परंतु, कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले,” असं कीर्तिकरांनी म्हटलं.

“रामदास कदम संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे”

“रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्‍याची इच्‍छा झाली आहे, म्‍हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्‍या वृत्‍तपत्र व सोशल मीडियावर प्रसारित करून वातावरण गढूळ करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या या दबावतंत्राला एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत. त्‍यामुळेच वैफल्‍यग्रस्‍त झाल्‍यामुळे रामदास कदम आदळआपट करीत आहेत. रामदास कदम संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. त्‍यांनी हे निष्‍पळ प्रयत्‍न थांबवावेत,” असा इशारा देत आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धारही कीर्तिकरांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mp gajanan kirtikar attacks radmas kadam over north west loksabha seat siddhesh kadam ssa