मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून यामुळे ते घऱातूनच काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हिवाळी अधिवेशन नागपुरात न घेता मुंबईत घेण्यात आलं. मात्र यावेळी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला दिला होता. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे.
“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य टीव्ही ९ शी बोलताना केलं आहे. ते म्हणाले की, “रश्मी ताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. रश्मी ठाकरे पडद्याच्या पुढे नाहीत, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणापैकी बरंच राजकारण त्यांना माहिती आहे. त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत असतात. उद्धव साहेबांचा आदेश असला तर मला वाटतं काहीही होऊ शकतं आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतात. सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही त्या उत्तम काम करत आहेत,” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
“…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा”, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला!
“लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे यासाठी राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसा काही निर्णय झाला तर सर्व शिवसैनिक त्याचं स्वागत करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही – चंद्रकांत पाटील
“दोन वर्षांपूर्वी बहुमत नसतानाही कृत्रिमपणे बहुमत निर्माण करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना, मग रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. पण त्यासाठी रश्मी वहिनींनी मुख्यमंत्री होण्याआधी पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रिमंडळात सामील व्हावं लागतं. उभ्या राहिल्या आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असं होऊ शकतं, पण त्यासाठी आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
नितेश राणेंनी केली होती टीका –
सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता नितेश राणेंनी राज्य कोण चालवतंय असा प्रश्न उपस्थित केला होता. “आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाहीय. मुख्यमंत्री आजारी आहेत आम्ही असं ऐकलेलं आहे. पण राज्याचं अधिवेशन सुरु आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीयत तर नेमकं राज्य कोण चालवत आहे?, मुख्यमंत्री चालवतायत की दुसरं कोणी चालवतंय?”, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला होता.
“राज्याचा चार्ज कोणाकडे दिलाय हेच आम्हाला माहिती नाहीय. आता कुठे लोक सांगतायत आणि असं ऐकलंय की रश्मी ठाकरेंना भविष्यात मुख्यमंत्री बनवणार आहेत. ते तरी जाहीर केला. ते तरी खरं आहे का सांगा? जेणे करुन आम्ही कानावर ज्या बातम्या पडतायत त्या ऐकून तरी आम्ही आशेत राहू की आम्हाला मुख्यमंत्री मिळेल. अधिवेशन सुरु असताना चार्ज कोणाकडे दिलाय?,” अशी विचारणाही नितेश राणेंनी केलीय.