अहिल्यानगर : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला जोरदार धक्का बसला. काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच हा धक्का दिला आहे. श्रीरामपूरमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माजी नगरसेवकांसह शहराध्यक्षांनी माजीमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महायुतीत प्रवेश केला, मात्र श्रीरामपूरमध्ये त्यापेक्षा वेगळी घडामोड घडली आहे.

ज्येष्ठ माजी नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार सर, रईस जहागिरदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, माजी नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण, मर्चंट बॅंकेचे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, सभापती सुधीर नवले, अंजुम शेख, मुज्जफर शेख, मुन्ना पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी ,के. सी. शेळके, निलेश नागले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल.

स्व. जयंतराव ससाने यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगरपरिषदेचा नावलौकिक हा राज्यात होता. मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. तो काळ श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखवले नाही. त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीवेळी श्रीरामपूरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत त्यांना धडा शिकवला. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील.

आमदार हेमंत ओगले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात स्व. ससाणेंप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करु, असे सांगितले. करण ससाणे म्हणाले की, आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहोत. येत्या काळात बरोबरीने काम करू. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की , हे प्रवेश शुभशकुन असून श्रीरामपूरची विस्कटलेली घडी बसविण्याकरिता या सर्व सहकाऱ्यांचा फायदा होईल. श्रीरामपूरमधील गुंडगिरी आणि नशेखोरी संपविणे हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. आभार राजेंद्र पवार यांनी मानले.