Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागांवर यश मिळालं. ज्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाविकास आघाडीने १८० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर महायुतीनेही जोमाने तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिर्डीत एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं असं म्हटलं आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. शिर्डीत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केलेल्या वक्तव्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो. तुमच्यासमोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या, असं साकडं साईबाबांकडे घातले. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाही. मी माजी मुख्यमंत्री आहे. माझा पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलंय आणि वडील पण चोरलेत, तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. त्यानंतर मला दिवार सिनेमाचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है, विश्वास है. तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाही. तरीही तुम्ही मला बोलवत आहात. मी देखील आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे”, असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन (Express photo by Amit Chakravarty)

लाडकी बहीण यांना आत्ता आठवली आहे

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “गेलेली सत्ता परत येते आणि जाते, यावेळी सत्ता नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे. त्यामुळे एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबरही होईल. हे सरकार पेन्शन देत नाही, त्यामुळे या सरकारला टेन्शन द्यायला हवं. तुम्ही आंदोलकांनी उपोषणाची हाक दिली पण ते करू नका. आपलं आंदोलन असं असायला हवं की हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत, हा निर्धार करा. आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अंमलात आणल्याशिवाय राहायचं नाही. निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आठवली”, असा टोला उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) लगावला.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार”, उद्धव ठाकरे यांचा महायुतीला इशारा

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं आणि आताही पडत नाही

“आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजनाची मान्य केली तर तुम्ही काय करणार? निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत. तुम्ही जर आमचं सरकार आणलात तर मी तुमची मागणी मान्य करतो. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, जर हे स्वत:च्या शिवसेना या आईवर वार करु शकतात, हे तुमच्यावर वार करणार नाहीत. त्यामुळे मला हे सरकार नको आहे. माझं मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही पडत नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडत नाही असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटल्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray imp statement on cm post he said not dreaming for the post scj