Uddhav Thackeray VS CJI DY Chandrachud MLA Disqualification Case : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाची आरती देखील केली. मात्र, या भेटीवरून सरन्यायाधीश व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “या भेटीवरून मी सरन्यायाधीशांची अथवा मोदींची निंदा करणार नाही. उलट मी सरन्यायाधीशांचे आभार मानेन. कारण, त्यांनी त्यांच्या घरी मोदी येणार आहेत म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही”. वैजापूर येथील ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना कोपरखळी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे उपस्थित नागरिकांना म्हणाले, “वैजापूरमधील प्रत्येक घरात शिवसेनेची मशाल पोहोचली पाहिजे, असं वचन मला तुमच्याकडून हवं आहे. येत्या काळात तुमच्यासमोर धनुष्यबाण व मशाल असे दोन पर्याय असतील. गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील, तर आपल्याकडे मशाल आहे. या निवडणुकीच्या आधी आमदार अपात्रतेसंदर्भात पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून आपण किती अपेक्षा करायची, मुळात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायची की नाही करायची याची मला कल्पना नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा आपल्या सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले. त्या घटनेची संपूर्ण देशभर निंदा झाली. संजय राऊत यांनी देखील त्यांची निंदा केली परंतु, मी त्याची निंदा करणार नाही”.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार”, उद्धव ठाकरे यांचा महायुतीला इशारा

नशीब, सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेले यावरून मी त्यांची निंदा करण्याऐवजी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. तुम्ही विचाराल की आभार का मानताय? त्याला एकच कारण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घरी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही हे नशीब. याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत. कदाचित ते गणपती बाप्पाला म्हणाले असते, आमच्याकडे नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे बाप्पा तू जरा नंतर ये. हा सगळा प्रकार पाहून असं वाटतं की या लोकांनी नुसती थट्टा चालवली आहे”.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही..”; उद्धव ठाकरे स्पर्धेतून बाहेर?

मला आता केवळ जनतेच्या न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे : उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “दोन वर्षांपासून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत आहोत. मुळात हा खटला केवळ शिवसेनेचा नाही, तर त्या माध्यमातून देशातील लोकशाही जीवंत राहणार की नाही हे सरन्यायाधीशांनी देशाला सांगायला हवं होतं. आमचा न्यायदेवतेवर जरूर विश्वास आहे, परंतु न्याय वेळेत मिळाला नाही तर त्या न्यायालयापेक्षा मोठं न्यायालय माझ्यासमोर बसलं आहे. या न्यायालयाचं नाव आहे ‘जनतेचं न्यायालय’ आणि हेच देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे, असं मी मानतो. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात आलो आहे. आजपासून मी सातत्याने जनतेच्या दरबारात जाईन. त्यामुळे मला आता तुमच्याकडून न्याय हवा आहे. निवडणुकीच्या वेळी मी परत येईन”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray sarcastic remark on pm modi visits cji dy chandrachud on ganeshotsav asc