रत्नागिरी:गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांना पत्करावा लागलेल्या पराभवाचा पराभवाची मंगळवारी राणे यांनी विजय मिळवत परतफेड केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मागील २०१४ व १९ या लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांचा पराभव केला. त्यापैकी गेल्या निवडणुकीत तर राऊत यांचे मताधिक्य पावणेदोन लाखांपेक्षा जास्त होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी अनपेक्षित पणे नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ही खेळी यशस्वी होऊन दीर्घ काळानंतर प्रथमच कोकणात भाजपचा उमेदवार विजय झाला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये राणे यांनी मावळते खासदार राऊत यांचा सुमारे ४८ हजार मतांनी पराभव केला. २५ फेऱ्यांपर्यंत रंगलेल्या या लढतीमध्ये राऊत यांनी पहिला दोन फेऱ्यांमध्ये किरकोळ आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या फेरीनंतर राणे यांनी ती मोडून काढली. त्यानंतर प्रत्येक फेरीगणिक त्यांचे मताधिक्य वाढतच राहिले आणि अखेरीस विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. योगायोगाची बाब म्हणजे, यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश हेही सुमारे ४७ हजार मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा >>>धाराशिव : ओमराजे निंबाळकर विक्रमी तीन लाख मतांनी विजयी, महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा

रायगडचा गड तटकरेंनी राखला…

●रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला.

●सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. तब्बल २७ हजार २७० जणांनी नोटा चे बटन दाबले. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गिते आघाडीवर राहीले.

तटकरे यांचे मतधिक्य वाढले

या मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला. तोही २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

तटकरेंना ५० टक्के मते

या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५०.१७ टक्के मते सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister narayan rane wins lok sabha elections in talkokan amy