लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सहकार क्षेत्रात एक आदर्श म्हणून ओळखला जाणारा सांगलीचा साखर कारखाना ज्यांना चालविता आला नाही, ज्यांच्याकडे कारखाना चालविण्याची धमकच नाही, असे खासदार होउन काय करणार अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीत कोंग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर केली. महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सांगलीतील स्टेशन चौक येथे गुरूवारी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ही निवडणूक देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविणारी आहे. ग्रामपंचायत, सोसायटी, खरेदी विक्री संघ अथवा जिल्हा परिषद, महापालिका यांची ही निवडणूक नसून देशातील १४० कोटींचे नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे. यामुळे जबाबदारीने वागले पाहिजे. देशाच्या विकासाचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. गेल्या दहा वर्षात केवळ देशातच नव्हे तर जगात देशाला मानसन्मान देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांची प्रगती साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

आणखी वाचा-उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा ट्रेलर – मुख्यमंत्री

पवार पुढे म्हणाले, सहकारात सांगलीचा साखर कारखाना आदर्श म्हणून पाहिला जात होता. मात्र, कारखाना चालविण्याची धमक नसलेल्यांच्या हाती कारखाना आल्यानंतर तो चालविताही आला नाही. भाडेकराराने देउन कारखाना चालवला जात आहे. अशा माणसांना खासदारकी देउन देशाचे वाटोळै करायचे आहे का? विकासाची दृष्टी असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा देश सोपविण्यासाठीच आपणाला भाजपला विजयी करायचे आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले, गेल्या दहा वर्षाचा मोदी सरकारचा कारभार म्हणजे एक ट्रेलर होता, यापुढे पिक्चर आहे. भरलेले ताट आता सामान्य माणसापुढे येणार आहे. एनडीएचे इंजिन नरेंद्र मोदी असून बाकी सर्व डबे आहेत. या डब्यात सामान्य माणसाला स्थान आहे. मात्र, विरोधकांकडे केवळ इंजिनच आहे. प्रत्येक नेता स्वत:ला इंजिन समजत असल्याने सामान्य माणसाला यामध्ये स्थानच नाही. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होत असून मोदींना आणि खासदार संजयकाका पाटील यांना तिसर्‍यांदा संधी देण्यासाठी सांगलीकर प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्‍वास वाटतो.

आणखी वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी स्वागत केले. व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, विनय कोरे, गोपीचंद पडळकर, सदाभाउ खोत, जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, नीता कैळकर, शेखर इनामदार, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.