रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा होत आहे. प्रथम केवळ कन्नडमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने थेट व्हिएतनामपर्यंत मजल मारली आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे तर काहींनी या चित्रपटावर सडकून टीकादेखील केली आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘वराह रूपम’ या गाण्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकूणच बॉक्स ऑफिस हादरवून टाकणारा हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटात रिषभ शेट्टी यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे तसेच या चित्रपटाचं लिखाण आणि दिग्दर्शन खुद्द रिषभ यांनीच केलं आहे त्यामुळे रिषभचं प्रचंड कौतुक होत आहे. नुकतंच ‘इटाइम्स’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिषभने या चित्रपटाच्या मेकिंगबद्दल बरेच किस्से उघड केले आहेत. याच मुलाखतीमध्ये त्याला या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबद्दल विचारणा झाली.

आणखी वाचा : “माझ्याशिवाय हा चित्रपट…” ‘दिल तो पागल है’ चित्रपटाच्या कोरिओग्राफरचे वक्तव्य चर्चेत

हा चित्रपट हिंदीमध्ये डब झालेला असल्याने याचा हिंदी रिमेक येणार नाही हे स्पष्टीकरण रिषभने या मुलाखतीमध्ये दिलं. याविषयी रिषभ म्हणाला, “कांतारामधील पात्र साकारण्यासाठी तुमची नाळ संस्कृतीशी जोडलेली हवी. हिंदी चित्रपटसृष्टीत असे कित्येक अभिनेते आहेत ज्यांच्या कामाचा मी चाहता आहे. पण रिमेक या प्रकारात मला स्वारस्य नाही.” याबरोबरच सध्या होणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्या तुलनेबद्दलही रिषभ यांनी मत व्यक्त केलं.

या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor director rishabh shetty speaks about remake of kantara in hindi avn