Ponnambalam South Actor : काही स्टार्स असे आहेत ज्यांनी एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य केले. पण, नंतर परिस्थिती अशी आली की, आज ते वाईट काळातून जात आहेत. एक प्रसिद्ध अभिनेता आहे, ज्याने चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले. दक्षिणेव्यतिरिक्त तो हिंदीमध्येही खूप लोकप्रिय झाला. त्याने सुनील शेट्टीच्या ‘रक्षक’ आणि अनिल कपूरच्या ‘नायक’मध्येही काम केले.
पण, आज तो वाईट काळातून जात आहे. हा दुसरा-तिसरा कोणी नसून खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता पोन्नम्बलम आहे. दारूच्या व्यसनामुळे त्याने दोन्ही किडनी गमावल्या आहेत. त्यामुळे तो अंथरुणाला खिळला आहे.
अभिनेता पोन्नम्बलमने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. तमीळ चित्रपटांबरोबरच तो मल्याळम आणि हिंदीमध्येही काम करताना दिसला आहे. १९८८ मध्ये प्रभू यांच्या ‘कलियुगम’ या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘अपूर्व सहधरंगल’, ‘वेत्री विझा’, ‘मिचल मदन कामराजन’ व ‘मननगर कवल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय करून त्याने आपली ओळख निर्माण केली.
पोन्नम्बलमने चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणूनही काम केले. तो एक विशेषज्ञ स्टंटमॅन बनला. तो इतका परिपूर्ण होता की, स्टंट करताना त्याला कधीही दुखापत झाली नाही किंवा फ्रॅक्चर झाले नाही, ज्यामुळे त्याला स्पेअर पार्टस, असे टोपणनाव मिळाले.
सरथकुमार यांच्या ‘नादमै’, ‘कुली’ व रजनीकांत यांच्या ‘मुथु’ या चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पोन्नम्बलमने १९९९ मध्ये १० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी रजनीकांत, कमल, अजित, विजय, सत्यराज व विजयकांत यांसारख्या सुपरस्टार्सबरोबर काम केले आणि हिंदीमध्येही स्वतःचे नाव कमावले. त्याने कदाचित फक्त तीन-चार हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असेल; पण लोकांना त्याचा चेहरा पाहताच त्याची भूमिका लगेच आठवते. त्याने ‘नायक’ चित्रपटात रंगा’ची भूमिका केली होती आणि ‘रक्षक’मध्येही एका भयानक खलनायकाची भूमिका केली होती.
पोन्नम्बलम शेवटचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कटेरी’ चित्रपटात दिसला होता. २०२२ मध्ये तो गंभीर आजारावर उपचार घेत असल्याने कॅमेऱ्यासमोर येऊ शकला नाही. दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे सध्या तो डायलिसीसवर उपचार घेत आहे.
त्याच्या उपचारांबद्दल बोलताना पोन्नम्बलम म्हणाला होता, “जेव्हा मी रुग्णालयात होतो तेव्हा सरथ कुमार यांनीच मला माझ्या उपचारांसाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर काही इतर लोकांनीही मदत केली. जेव्हा घरी आर्थिक समस्या होती तेव्हा धनुषने मला मदत केली. जेव्हा घरी संकट आले तेव्हा अभिनेता अर्जुननेही मला मदत केली. डॉक्टरांनी मला सांगितले होते की, मी फक्त एक वर्ष जगू शकेन. डायलिसीस ही जगातील सर्वांत क्रूर शिक्षा आहे. मला इंजेक्शन घ्यावी लागतात. गेल्या चार वर्षांपासून मी एकाच ठिकाणी ७५० इंजेक्शन्स घेतली आहेत. हे खूप कठीण आहे. मी खारट अन्न खाऊ शकत नाही. मी पोटभर जेवू शकत नाही. माझ्या लग्नाला २५ वर्षं झाली आहेत; पण आतापर्यंत मी माझ्या कुटुंबाला रुग्णालयात बोलावलेलं नाही.”
पोन्नम्बलम असेही म्हणाला, “मी आतापर्यंत माझ्या उपचारांवर ३५ लाख रुपये खर्च केले आहेत. अभिनेता चिरंजीवीने मला पैसे देऊन मदत केली. पण, अनेक कलाकारांनी मी कसे जगतोय हे विचारले नाही. एकदा शूटिंगदरम्यान माझे चिरंजीवीशी भांडण झाले होते; पण त्यानं सर्व काही विसरून मला मदत केली.”