Abhishek Bachchan Aishwarya Rai : बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. दोघांच्या नात्यातील दुरावा व घटस्फोटाच्या अफवांमुळे हे दोघे मागील वर्षभर चर्चेत होते. या जोडप्याबद्दल सतत काही ना काही बातम्या येत असतात. ऐश्वर्या अभिषेक बच्चनबरोबर राहत नसल्याचंही म्हटलं जातं. सलमान व विवेक ओबेरॉयला डेट केल्यावर ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केलं. दुसरीकडे करिश्मा कपूर व राणी मुखर्जीनंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या आली होती. त्यामुळे या दोघांच्या नात्याने लक्ष वेधून घेतले होते.
सोशल मीडियावर अनेक जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. पण अभिषेकने ऐश्वर्याला कसं प्रपोज केलं होतं ते फार लोकांना माहित नाही. अभिषेकने एकदम फिल्मी स्टाइलमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं आणि ते पाहून ऐश्वर्या भारावली होती. गुरू चित्रपटाच्या प्रिमियरसाठी दोघेही न्यू यॉर्कमध्ये होते, तिथेच खोलीच्या बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. त्यानंतर अभिषेकने घरी फोन करून त्याच्या आई-वडिलांना याबाबत सांगितलं होतं. यावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया काय होती, ते जाणून घेऊयात.
अभिषेक बच्चनने घरी फोन करून सांगितलेलं
एकदा अभिषेकचे वडील महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याबद्दल कळल्यावर प्रतिक्रिया दिली होती. “अभिषेक व ऐश्वर्या एकमेकांवर प्रेम करतात. न्यू यॉर्कमध्ये, गुरुच्या प्रीमियरनंतर, अभिषेकने मला फोन केला आणि सांगितलं की त्याने तिला प्रपोज केलं आहे. मी म्हणालो, ‘घरी ये.’ मग मी ऐश्वर्याला ती आनंदी आहे का? असं विचारलं. तिने हो म्हटलं. मी त्या दोघांना घरी घेऊन गेलो. मी तिला सांगितलं, हे तुझे घर आहे. आम्हाला काय देणं-घेणं बाकी गोष्टीशी,” असं अमिताभ बच्चन ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्याबद्दल समजल्यावर म्हणाले होते.
अभिषेकने हॉटेलच्या बाल्कनीत केलेलं ऐश्वर्याला प्रपोज
अभिषेकने स्वतः एकदा न्यू यॉर्कमध्येच ऐश्वर्याला लग्नासाठी मागणी घालण्यामागचं कारण सांगितलं होतं. “मी न्यू यॉर्कमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मी माझ्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून अशी इच्छा व्यक्त करायचो की एके दिवशी मी तिच्याशी लग्न केलं तर… म्हणून मग मी तिला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि मी तिला लग्नासाठी मागणी घातली होती,” असं अभिषेक ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये म्हणाला होता. अभिषेकची ही कृती ऐश्वर्याला खूप आवडली होती. “ते सगळं खूप गोड होतं, भावना खऱ्या होत्या,” असं ऐश्वर्याने म्हटलं होतं.
दरम्यान, ऐश्वर्या व अभिषेक यांच्या लग्नाला आता १८ वर्षे झाली आहेत. या जोडप्याला आराध्या नावाची गोंडस मुलगी आहे. मागील वर्षी अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता, तर ऐश्वर्या लेक आराध्याला घेऊन वेगळी आली होती; त्यामुळे या जोडप्यात सगळं आलबेल नसल्याच्या खूप चर्चा झाल्या होत्या. पण नंतर मात्र ऐश्वर्या व अभिषेक यांनी अनेक लग्नांमध्ये एकत्र हजेरी लावली. दोघांचे एकमेकांबरोबरचे सुंदर फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
© IE Online Media Services (P) Ltd