चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यांना काम मिळत नाही, तर अनेकदा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता अभिनेत्री अनन्या पांडेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पहिले वर्ष तिच्यासाठी किती कठीण होते, याबद्दल वक्तव्य केले आहे. “मला युनायटेड स्टेटसमधील अनेक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते. मात्र, ‘स्टुंडट ऑफ द इअर २’मध्ये मला संधी मिळाल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले”, असे अनन्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

बरखा दत्तच्या मोजो स्टोरीमध्ये अनन्या पांडेने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी सोशल मीडियाचा तिचा सुरुवातीचा अनुभव सांगताना ती म्हणाली, “मी शाळेत असताना सोशल मीडिया सुरू झाले होते. कुबड्या, सपाट पडदा, कोंबडीचे पाय अशा प्रकारच्या गोष्टी मला म्हटल्या गेल्या. आम्ही शाळेत होतो, आम्ही आमच्याच दुनियेत होतो. आता सोशल मीडियामुळे सगळ्यात कमी आवाजाची तीव्रतादेखील वाढवता येते. याचा माझ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला. आजही होतो. स्वत:वर प्रेम करणे हा प्रवास आहे, शेवटचे ठिकाण नाही.”

अनन्याने म्हटले, “मी अभिनेत्री आहे, काही वेळा मला सोशल मीडिया वापरायचे नसते तरीदेखील मला त्याचा वापर करावा लागतो. काही दिवस असे असतात की मला सोशल मीडियाचा वापर करायचाच नसतो. पण, त्याचा परिणाम माझ्या लहान बहिणीवर होतो. ती अभिनेत्री नाही. या क्षेत्रात येण्याचा तिचा कोणता प्लॅनही नाही. जेव्हा जेव्हा आम्ही तिचा फोटो पोस्ट करतो, ती म्हणते मला टॅग करू नका, कारण लोक मला फॉलो करतात आणि नको ते प्रश्न विचारतात.”

सोशल मीडियावर तिच्या शिक्षणाबद्दल ज्या अफवा पसरल्या होत्या त्यावर बोलताना तिने म्हटले, “मी पहिल्या वर्षात होते, कोणीतरी इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले. त्यांनी असे लिहायला सुरुवात केली की ते माझ्याबरोबर शाळेत होते. मला या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी आवडतात आणि मी माझ्या शिक्षणाबद्दल खोटे बोलले आहे. मला पहिल्यांदा वाटले, कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण, लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. ते सगळे प्रकरण हाताबाहेर गेले, त्यामुळे मी खूप नाराज होते.”

सोशल मीडियावर कोणीतरी अनन्याचा शाळेतील वर्गमित्र आहे असे सांगून तिच्यावर आरोप केले होते. ती शाळेतील सामान्य घरातील मुलांना त्रास देते. तिने तिच्या बॉयफ्रेंडला फसवले आहे. यावर अनन्याने एका इन्स्टाग्रामवर पोस्टवर स्वत:ची बाजू मांडत लिहिले होते की, जे लोक असे आरोप लावून मला खाली खेचण्याचा प्रयत्न करित आहेत, त्यांना खूप प्रेम, शांतता आणि सकारात्मकता पाठवू इच्छिते. मला हेही सांगायचे आहे की, जरी ते असे सांगत असले की ते माझे वर्गमित्र आहेत, पण मला विश्वास आहे की मी ज्या मुलांबरोबर शिकले आहे, शाळेत गेले आहे, ते असे कधीच करणार नाहीत.”

हेही वाचा: विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हाती सोपवली नव्या गाडीची किल्ली; किंमत ऐकून थक्क व्हाल…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूर आणि तिचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. आता अनन्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday on rumours about her bullying other children and cheating on boyfriend nsp