‘गदर २’ हा चित्रपट या वर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल अनेक अपडेट्स समोर येत होते. नुकताच या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मात्र आम्ही तुम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगणार आहोत. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ची कथा नेमकी कशी सुचली अन् ती सत्य घटनेवर बेतलेली आहे का, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा काश्मिरी पंडितांच्या पलायनावर चित्रपट बनवत होते. लेखक शक्तिमान तलवार यांच्यासोबत ते अनेक महिने यावर काम करत होते. कास्टिंगसाठी अनेक कलाकारांशी आधीच बोलणी झाली होती. अमिताभ आणि दिलीप कुमार यांनीही जवळपास सहमती दर्शवलीच होती.

आणखी वाचा : Gadar 2 Teaser : १९७१ चं युद्ध, ‘Crush India’च्या घोषणा अन् पाकिस्तानचा जावई; ‘गदर २’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

त्या चित्रपटात काश्मीरमधील एका मुलाची आणि पीओकेमधील एका मुलीची प्रेमकहाणी असलेल्या सबप्लॉटची गरज होती. याबद्दल दोघांचे प्रचंड विचारमंथन सुरू होते. शक्तिमान आणि अनिल यांनी जगातील १०० सर्वोत्तम प्रेमकथा वाचल्या. अशातच शक्तिमान हे अनिल शर्मा यांच्याकडे ब्रिटिश सैन्यातील जवान ‘बुटा सिंग’ यांची कहाणी घेऊन गेले आणि ती त्यांना वाचून दाखवली.

भारत-पाक फाळणीदरम्यान बुटा यांनी जैनब या मुस्लीम मुलीचे प्राण वाचवले होते. दोघेही प्रेमात पडले, लग्न झाले. त्यांना मुलगी झाली. जैनब मुस्लीम असल्याने तिला पाकिस्तानात पाठवण्यात आले. बुटा सिंगला पाकिस्तानात जाण्याची परवानगी नव्हती. जैनबसाठी तो बेकायदेशीरपणे पाकिस्तानात पोहोचला. बुटा तिच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करतो. पण झैनबच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न तिच्या चुलत भावाशी लावलेले असते. येथे बुटा सिंगला बेकायदेशीरपणे पाकिस्तानात प्रवेश करताना पकडले जाते. जैनबने बुटाचे लग्न स्वीकारण्यास नकार दिल्याचे त्याला सांगितले जाते. यामुळे बुटा इतका दुःखी होतो की तो ट्रेनसमोर उडी मारतो आणि त्याचा मृत्यू होतो.

अनिल शर्मा यांनीही जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकात ही कथा वाचली होती. त्यांनी यावर विचार करायला सुरुवात केली अन् काश्मिरी पंडितांची कथा त्यांनी बाजूला ठेवली अन् या कथेवर काम सुरू केलं. अनिल यांनी तब्बल २० मिनिटांत ‘गदर’ची कथा पूर्ण लिहून काढली, फक्त त्यात एक ट्विस्ट होता. हा ट्विस्ट अनिल यांना ‘रामायणा’पासून सुचला होता. सीतेला पुन्हा आणण्यासाठी श्रीराम लंकेला जातात अगदी तसंच पण या कथेत फरक असा होता की तारा सिंग सकीनाला घेण्यासाठी पाकिस्तानला जाणार, तोही आपल्या मुलाच्या सांगण्यावरून. यावरच शक्तिमानने पटकथा लिहिली अन् ‘गदर’ तयार झाला.

चित्रपट लिहून झाल्यावर ही कथा अनिल शर्मा यांनी सनी देओल, अमरीश पुरी, गीतकार आनंद बक्षी यांना ऐकवली. या सगळ्यांच्या डोळ्यात कथा ऐकताना अश्रू आले होते. इतकंच नव्हे तर जेव्हा कथा ऐकवून पूर्ण झाली तेव्हा आनंद बक्षी यांनी अनिल शर्मा यांना आलिंगन दिलं आणि ते त्यांना म्हणाले, “हा तुझा ‘मुघल-ए-आजम’ आहे.” या चित्रपटाने इतिहास रचला. २२ वर्षांनी आता याच्या सीक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil sharma directed gadar ek prem katha was inspired from true events or not avn