Mamta Kulkarni statement on Pakistan: एकेकाळी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी आता साध्वी झाली आहे. तिने प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. तसेच तिची किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीमुळे वादात अडकलेल्या ममता कुलकर्णीने पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावाबद्दल विचारलं असता ममता कुलकर्णी म्हणाली, “मी त्यासाठी माझा मेसेज आधीच दिला आहे. पाहा, माझं मुस्लिमांवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं आहे. माझी २५ वर्षांची साधना… मी दुबईमध्ये एकाच ठिकाणी बसून तपस्या केली, त्यामुळे मला खूप प्रेम, शांती मिळाली आहे.”
पाकिस्तानमधून दररोज यायची पत्रे – ममता कुलकर्णी
“जेव्हा मी बॉलीवूड सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानातून दररोज ५० पत्रे येत यायची. माझं मुस्लीम लोकांवर खूप प्रेम आहे, पण मला दहशतवादी आवडत नाहीत. दहशतवादी हा फक्त एक दहशतवादी असतो. तो ना कोणाचा पती असतो, ना तो कोणाचा बाप किंवा मुलगा असू शकतो. तो फक्त एक दहशतवादी असतो. तो कोणाचाही नसतो,” असं ममता कुलकर्णी आयएएनएसशी बोलताना म्हणाली.
ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर २०२४ च्या अखेरीस भारतात परतली. ती महाकुंभमेळ्यासाठी भारतात आली. महाकुंभमेळ्यात तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर बनवण्यात आलं, त्यानंतर ती खूप चर्चेत राहिली. तिला महामंडलेश्वर करण्यात आल्याने अनेकांनी आक्षेप घेतला होता, त्यानंतर तिने पद सोडत असल्याचं म्हटलं होतं, पण तिचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही आणि ती पदावर कायम राहिली. एएनआयशी बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली, “महाकुंभात महामंडलेश्वर पद मिळणं हे देवाच्या हातात होतं. हा १४० वर्षांतील सर्वात पवित्र प्रसंग होता. देवाने मला माझ्या २५ वर्षांच्या तपश्चर्येचे फळ दिले. म्हणून ते पद मिळालं.”
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आक्षेप घेतला होता. ममताची नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांना न कळवता घेण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.