बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपट, त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, त्यांनी केलेले वक्तव्ये यांद्वारे हे कलाकार चर्चांमध्ये राहतात. आता प्रसिद्ध अभिनेता विजय वर्माने (Vijay Verma) एका मुलाखतीदरम्यान आपल्या कठीण काळाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तो चर्चांचा भाग बनला आहे.
काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता विजय वर्माने नुकतीच शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यात जो कठीण काळ होता, त्याबद्दल बोलताना म्हटले, “एक काळ असा होता की, जो सगळ्यात वाईट होता. माझ्या बँक अकाउंटमध्ये फक्त १८ रुपये उरले होते; ज्यामध्ये मी पाणीपुरी किंवा इडली खाऊ शकत होतो. माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते आणि त्यामुळे माझी घरची परिस्थिती उत्तम असली तरी घरातून पैसे घेणे बंद केले होते. मी पैशांसाठी काही छोट्या भूमिका केल्या; मात्र तो माझ्यासाठी वाईट अनुभव होता. माझ्या आयुष्यातील तो कठीण काळ होता.” असे या मुलाखतीवेळी अभिनेत्याने सांगितले.
‘मिर्झापूर ३’ या वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्माने वडिलांबरोबरच्या नात्यावर व्वयक्त केले होते. “जेव्हा मी माझ्या वडिलांना मला अभिनेता व्हायचं आहे, अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला घराबाहेर काढलं होतं”, अशी आठवण त्याने सांगितली होती.
हेही वाचा: Video: आर्या झाली अरबाजसाठी भावुक; नेटकरी म्हणाले, “हिने तर सगळेच…”
विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचे, तर ‘शोर’ या शॉर्ट फिल्ममधून त्याने अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. गली बॉय या चित्रपटात साकरलेल्या मोईनच्या भूमिकेतून अभिनेत्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘रंगरेज’, ‘पिंक’, ‘मंटो’, ‘सुपर ३०’, ‘बागी ३’, ‘डार्लिंग्स’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘जाने जान’, ‘मर्डर मुबारक’ अशा अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत अभिनेत्याने मनोरंजनसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आता तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आय सी ८१४ : द कंदहार हायजॅक’ (IC 814: The Kandahar Hijack) या सीरिजमध्ये दिसणार आहे.
दरम्यान, अभिनेता विजय वर्मा अभिनेत्री तमन्ना भाटियाबरोबर असलेल्या नात्यामुळेदेखील सतत चर्चांचा भाग बनत असल्याचे पाहायला मिळते.
© IE Online Media Services (P) Ltd