Zayed Khan recalled his father Sanjay Khan’s Tragic fire Accident: टेलिव्हिजनवर दिसणारा ९० च्या दशकातील सर्वात हँडसम अभिनेता म्हणून संजय खान यांची ओळख होती. १९८९ साली ‘द सॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ या मालिकेत ते काम करत होते. या मालिकेचे शूटिंग म्हैसूर येथे सुरू होते. शूटिंगदरम्यान सेटला आग लागली आणि मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले.

आग विझवण्याची साधने नसल्याने आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याने ५२ क्रू मेंबरना त्यांचा जीव गमवावा लागला. ७८ वर्षीय अभिनेता संजय खान यांच्यावर ७४ सर्जरी कराव्या लागल्या. त्यांनी १३ महिने उपचार घेतले. संजय खान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते आणि १८ व्या शतकातील म्हैसूरचा राजा टिपू सुलतानची भूमिकादेखील साकारली होती. ८ फेब्रुवारी १९८९ ला प्रीमिअर स्टुडिओला आग लागली होती.

आता अभिनेता झायेद खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांच्या या अपघातानंतर कुटुंबावर काय परिस्थिती ओढावली होती, यावर वक्तव्य केले आहे. झायेद खानने सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती.

या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “वडिलांचा अपघात झाल्यानंतर माझ्यावर खूप मोठे संकट ओढावले होते. मी माझ्या आई आणि बहि‍णींना ज्या अवस्थेत पाहिलं, ते पाहणे माझ्यासाठी फार दु:खद होते. मी त्यांना कशी मदत करू शकतो, याचा मी विचार करायचो. त्यांची काळजी कमी व्हावी, जबाबदारी कमी व्हावी यासाठी मी माझ्या पालकांकडे बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची परवानगी मागितली.

“आमची आर्थिक परिस्थिती फार…”

अभिनेता पुढे म्हणाला, “आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. त्या अपघातात बरेच लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी कोणताही विमा नव्हता, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडला होता. मला वाटले की बोर्डिंग स्कूलमध्ये जाऊन माझा भार कमी करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.”

“आम्ही गाड्या विकल्या, आमचे घर गहाण ठेवले. अशा काळातच आपले खरे मित्र कोण हे कळत असते, पण आम्ही कोणावर राग धरला नाही. पुन्हा असाही एक काळ आला की आम्ही आमचे घर परत मिळवले, नवीन गाड्या विकत घेतल्या.”

अपघातानंतर वडिलांना पहिल्यांदा रुग्णालयात पाहिले तेव्हाची आठवण सांगताना झायेद म्हणाला, “सेटवरील आगीत वडील जेव्हा जखमी झाले, तेव्हा मी फक्त ११ वर्षांचा होतो. एका महिन्यानंतर जेव्हा त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मला त्यांना भेटण्याची खूप आतुरता होती. आगीत जखमी झालेल्या दोन रुग्णांचे बेड आयसीयूमध्ये होते. दुसऱ्या बेडवर माझे वडील असतील असे समजून मी पहिल्या बेडच्या थोडे पुढे गेलो. ते पहिल्याच बेडवर होते. त्यांनी मला मागून आवाज दिला. मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो की हे माझे वडील नाहीत.

“मी जवळ गेलो आणि त्या जळालेल्या व्यक्तीकडे पाहिले, त्यांचे डोके फुटबॉलसारखे दिसत होते. त्वचा वितळत होती. मी बघतच राहिलो. त्यांनी माझा हात धरला आणि मला विचारले की झायेद तुला भीती वाटत आहे का? त्या क्षणी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते.”

वडिलांच्या शब्दांनी प्रेरणा मिळाल्याचेदेखील अभिनेत्याने सांगितले. ते मला म्हणाले की काळजी करू नकोस. मी चांगले रुग्णालय तयार करेन, जिथे माझ्यासारख्या लोकांवर उपचार केले जातील. मी हॉटेल बांधेन. मी पुन्हा टिपू सुलतान मालिका बनवेन. आपल्याला चांगले दिवस येतील. ते ज्यावेळी हे बोलले त्यावेळी ते अशक्य वाटत होते, कारण सगळ्या डॉक्टर्सनी हे सांगितले होते की ते जगणार नाहीत. मी विचार करत होतो की ते यातून बाहेर येतील, असं कसं बोलू शकतात?”

“दोन वर्षांनंतर ते बरे झाले, त्यावेळी त्यांच्यावर ७४ सर्जरी झाल्या होत्या. टिपू सुलतानचे शूटिंगदेखील संपले होते. ते मला बेंगलोरला घेऊन गेले आणि त्यांनी मला तिथे विकत घेतलेली जमीन दाखवली. ते मला म्हणाले, मी तुला रुग्णालयाबद्दल बोललो होतो. ते रुग्णालय आणि हॉटेल इथे बांधूया. त्यांनी मला विचारले की तू याला काय नाव देशील? त्यावर मी गोल्डन पाल्म असे म्हणालो. त्यानंतर तिथे त्यांनी हॉटेल बांधले.

दरम्यान, झायेद खान लवकरच ‘द फिल्म दॅट नेव्हर वॉज’ या चित्रपटातून भेटीला येणार आहे.