कुटुंबात सासू-सून तंटे हा आदिम उपचार आहे. त्याबद्दल कितीही उगाळलं तरी कोळसा काळाच निघणार. पण अलीकडच्या काळात स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे किमान काही घरांत तरी सासू-सुनेत सौहार्दाचं वातावरण असतं. विशेषत: दोघीही विचारी आणि समंजस असतील आणि कुटुंबातील परस्परांच्या योगदानाबद्दल कृतज्ञ जाणीव असेल तर या नात्यातही जिव्हाळा, प्रेम, आपुलकी पाहायला मिळते. परंतु एकूणच भारतीय पारंपरिक कुटुंबसंस्थेत हे पाहायला मिळणं जरा अवघडच. त्यामुळेच या नात्यावर आधारित कितीही कलाकृती आल्या तरी त्यांचा रोखही पारंपरिक- म्हणजे साप-मुंगुसाच्या नात्याचाच असतो. मग त्याला त्या कलाकृतीत काय फोडणी दिलीय एवढीच उत्सुकता उरते.
‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये आणि इतरही अशाच नाटकांत आपण हे पाहिलेलं आहेच. आता नव्यानं रंगमंचावर आलेलं विनोद रत्ना यांच्या कथासूत्रावर आधारित संकर्षण र्क हाडे लिखित आणि अमेय दक्षिणदास दिग्दर्शित ‘कुटुंब कीर्रतन’ हे नाटकही याला अपवाद नाही. मात्र त्यातील वेगळी पार्श्वभूमी आणि त्याची हाताळणी हाच या नाटकाचा ह्ययूएसपीह्ण आहे. नाटकाच्या शीर्षकातच नात्यातील कर्कशता अध्याहृत आहे. आणि ती या नाटकात आहेच. पण त्यातही विठ्ठलभक्त नायकाचा एक अलवार स्पर्शसुद्धा यात तीव्रतेनं जाणवतो. संकर्षण र्क हाडेंची सर्वपरिचित खुसखुशीत विनोदी शैली, त्यात आणखी मराठवाड्याकडच्या बोलीचा गावरान तडका नाटकात धूमधमाल धुमशान घालतो.
तिशीचा पुंडलिक आईच्या काळजीपोटी लग्न करण्यास कचरत असतो. कोण कशी मुलगी मिळेल, काय माहीत. ती आईला नीट वागवेल ना, याची त्याला चिंता असते. त्यामुळे लग्नाच्या भानगडीत न पडलेलंच बरं असं त्याला वाटत असतं. त्यात तो पडला कीर्तनकार बुवा. गावोगाव कीर्तनं करत फिरणारा. संसार म्हणजे मोह-माया मानणारा. आणि हेच लोकांना नित्य कीर्तनातून सांगणारा. साहजिकच या विचाराचा पगडा काही प्रमाणात त्याच्या स्वत:वरही असणारच. शिवाय घरातच विठ्ठलाचं मंदिर. दिवस-रात्र त्याच्या सेवेत माय-लेक मग्न.
त्यामुळे पुंडलिक तिशी गाठूनही सडाफटिंगच राहिलेला. पण अशा होतकरू तरुणांच्या मागावर उपवर मुलींचे आई-वडील असतातच. मग पुंडलिक तरी त्यातून कसा सुटेल? शेजारच्या गावातील अनिलराव नावाचे गृृहस्थ आपल्या मुलीचं स्थळ घेऊन पुंडलिकच्या घरी येतात. सोबत शिवानीला (मुलीला) घेऊन येतात. पण चंचल, अल्लड, उच्छृंखल शिवानी जरा जादाच असते. पुंडलिकच्या आईशी तिची पहिल्याच भेटीत झकाझकी होते. ही आगाऊ मुलगी आपल्या मुलाच्या काही कामाची नाही हे तिच्या लगेचच लक्षात येतं. पण पुंडलिक मात्र शिवानीच्या सौंदर्याच्या, विलक्षण बोलक्या स्वभावाच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करून मोकळा होतो.
पण घरात आल्या दिवसापासून सासू-सुनेत वाजलं नाही असा एकही क्षण जात नाही. त्यात मधल्या मध्ये पुंडलिकचं मात्र भजं होतं. हा वाद इतक्या टोकाला जातो की शिवानीला पुंडलिकची आई घराबाहेर काढते. माहेरी धाडते. तेव्हा ती गर्भार असते. बायकोविना पुंडलिकला घर खायला उठतं. पण करता काय? आई आणि बायकोचं क्षणभर पटत नाही. तशात शिवानीने ‘मला उकडलेलं अंडं खावंसं वाटतं’ असं सांगितल्यामुळे तर त्या शुद्ध, सात्विक, शाकाहारी घरात एकच गहजब होतो. असली नाठाळ सून नसलेली बरी असं आईचं म्हणणं पडतं. घरातून बाहेर काढलेली शिवानीही नवऱ्याच्या आठवणींनी इकडे तळमळत असते. पण या पेचातून आता मार्ग कसा निघणार?
शेवटी काय होतं हे सांगण्यापेक्षा तुम्ही नाटक प्रत्यक्ष पाहणंच योग्य.
संकर्षण कऱ्हाडे यांनी सासू-सून वादावरचं हे नाटक परभणीकडच्या गावरान बोलीत छान हसतखेेळत रचलंय. आहे पारंपरिकच गोष्ट, पण त्यांनी त्याला विनोदाची अशी काही झणझणीत फोडणी दिली आहे की ज्याचं नाव ते. क्षणभरही प्रेक्षकाला हसून हसून गडाबडा लोळायला लावलं नाही तर नावाचा संकर्षण नाही अशी काहीशी खूणगाठ बांधूनच त्यांनी सबंध नाटकाची रचना केली आहे. पुंडलिक कीर्तनकार असल्याने एकीकडे ह्यकुटुंब कीर्तनाह्णची अखंड वीणाही नाटकात समांतरपणे सुरू राहते. शिवानी आणि पुंडलिकची आई एकापेक्षा एक असल्याने कुणीही भांडणात माघार घेत नाहीत. दोघीही एकमेकींचा एक शब्दही कधी खाली पडू देत नाहीत. आता यातून मार्ग कसा निघणार असं वाटत असतानाच मार्ग निघतो… कसा, ते प्रत्यक्ष नाटकात बघणंच उचित.
लेखकानं उत्तरोत्तर नाटकाची रंगत वाढवत नेणारे चढते प्रसंग यात रेखाटले आहेत. व्यक्तिरेखाटनातही त्यांनी प्रत्येकाचं वल्लीपण यथास्थित जपलं आहे. देवभक्त पुंडलिकची या दोघींत होणारी गोची हास्यस्फोटक आहे. मात्र मधला पुंडलिकची बिदागी वाढवण्याचा शिवानीचा उफराटा उद्याोग नाटकाच्या स्थायीभावाला काहीसा छेद देतो. अर्थात घटना-प्रसंगांची रंगत चढत्या भाजणीनं उत्कर्षाप्रत नेण्यात लेखक यशस्वी झाला आहे. दिग्दर्शक अमेय दक्षिणदास यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. पण त्यांनी अत्यंत सफाईनं आणि दिग्दर्शकीय कौशल्य पणाला लावून प्रयोग कायम गतिमान राहील हे पाहिलं आहे. प्रत्येक पात्रावर त्यांनी मेहनत घेतल्याचं जाणवतं. प्रारंभीचं पुंडलिकच्या आईचं विठ्ठलाला उद्देशून असलेलं दीर्घ स्वगत मात्र संपादित करण्याची गरज होती. संहितेतील घटना-प्रसंगांचा टेम्पो प्रवाही, वेगवान आणि हास्यस्फोटक राहील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी कीर्तनकार पुंडलिकचं सात्विक घर, त्यातलं सूचक विठ्ठल मंदिर, वाडासदृश्य रचना वास्तवदर्शी केली आहे. किशोर इंगळे यांच्या प्रकाशयोजनेनं प्रवेशांतील नाट्य आणखी खुलून आलं आहे. अशोक पत्की यांच्या संगीतानं नाटकाला आवश्यक ती सांगीतिक पार्श्वभूमी बहाल केली आहे.
पुंडलिकच्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे यांनी तरुण कीर्तनकार आणि आई-बायकोच्या सततच्या भांडणांनी कावलेला नवरा भूमिकेत घुसून साकारला आहे. त्याची फरफट, दोघींत सामंजस्य निर्माण करण्याचे त्याचे थकलेले उपाय आणि शेवटी परिस्थितीला शरण जात ह्यजे जे होईल ते ते पाहावेह्ण या निष्कर्षाप्रत त्याने येणे, त्यातली उलघाल, आई आणि बायकोवरचं निरतिशय प्रेम… हे सारं त्यांनी उत्कटतेनं व्यक्त केलं आहे. लाडात आल्यावर बायकोला अत्यंत प्रेमानं त्यांनी ‘हरणे’ म्हणणं लाजवाब. वंदना गुप्ते यांनी आक्रस्ताळी आणि शेवटी प्राप्त परिस्थिती स्वीकारणारी पुंडलिकची खाष्ट आई तिच्या सगळ्या लकबींसह धमाल साकारली आहे. त्यांची विनोदाची जाण उत्तमच आहे. त्यांनी त्याचा वानवळा यात दाखवला आहे. तन्वी मुंडले ही एक गुणी अभिनेत्री या नाटकानं रंगभूमीला मिळाली आहे. त्यांचं अल्लड, चंचल, उच्छृंखल रूप, अरेला कारे करण्याची वृत्ती मुद्राभिनयासह अवघ्या देहबोलीतून प्रकटते. त्यांच्यात एक विलक्षण गोडवा आहे; ज्यामुळे त्यांचा भांडखोर स्वभावही लोभस वाटतो. सूक्ष्म भावआंदोलनं टिपणारा त्यांचा भावस्पर्शी चेहरा अर्धीअधिक भूमिका व्यापून टाकतो. अमोल कुलकर्णी यांनी शिवानीचे वडील आणि गावातले तालेवार पुढारी अशा दुहेरी भूमिकांत तिचं तिचं वेगळेपण नेमकेपणानं दाखवलं आहे.
एकुणात चार घटका मस्त टाइमपास करणारं हे नाटक न बघाल तर एका दे धमाल अनुभवाला मुकाल.