भाजपाकडून मराठी गायक राहुल देशपांडे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. वरळीमधील जांबोरी मैदानात आयोजित ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी, राहुल देशपांडे यांना गाणं थांबवायला सांगितलं, असा त्यांचा दावा आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना राहुल देशपांडे यांनी यावर ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मराठी कलाकारांची चेष्टा’, भाजपाच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान? टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवल्याचा आरोप

राहुल देशपांडे यांनी अपमान झाल्याचा दावा फेटाळला आहे. “इतकी काही मोठी गोष्ट घडलेली नाही. मला काही अपमान वैगेरे वाटलेला नाही. मला हा विषय इतकं बोलण्यासारखा वाटत नाही,” असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेमकं काय झालं?

जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त भाजपाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करत होते. याचवेळी टायगर श्रॉफ कार्यक्रमस्थळी पोहोचला. यामुळे त्याचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांना भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी काही वेळासाठी गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं असल्याचा आरोप आहे.

‘मी उठून जाऊ का?,” राहुल देशपांडे भाजपाच्या कार्यक्रमात संतापले, ठाकरे गटाच्या दाव्यावर शेलार म्हणाले “कोल्हेकुई….”

सचिन अहिर यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून, ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान’ अशी विचारणा केली. “मराठी कलाकारांची चेष्टा” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सचिन अहिर यांचा आरोप काय ?

“नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी तसंच इतर सणांच्या माध्यमातून आपण मराठी माणसांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दाखवत आहेत. पण या व्हिडीओमुळे यांची खऱ्या अर्थाने मराठी माणूस आणि कलाकरांबद्दल अस्मिता काय आहे हे दिसत आहे. निवडणूका आल्यानंतर अशा गोष्टी करायच्या, पण नंतर कोणत्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जात नाही,” असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

“ज्येष्ठ कलाकार गाणं गात असताना दोन वेळा अडवणूक झाल्याने त्यांनीच मला तरी बोलू द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असं सांगितलं. टायगर श्रॉफही मुंबईतच मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण तुम्ही खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता,” असा संताप सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे.

आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

“उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं आणि नाव बदलून घ्यावं. आपलं नाव रडकी सेना ठेवावं. काही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत आणि अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरु केला आहे. सचिन अहिर त्यांचे नेते असून तेच काम करत आहेत,” अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

खरोखरच अपमान झालाय का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “असा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठी माणसाच्या मराठमोठ्या दिपोत्सवात हिंदी कलाकार येत आहेत, हा मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपाकडून मराठी माणसाचा सन्मान होतोय याची कोल्हेकुई सचिन अहिर यांची आहे,” असे आशिष शेलार यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi singer rahul deshpande on thackeray faction sachin ahir claims worli bjp diwali programme mihir kotecha sgy