अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'टिप टिप बरसा पानी' (Tip Tip Barsa Pani) हे गाणं दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटामध्ये रीक्रिएट करण्यात आलं होतं. 'मोहरा' चित्रपटामधील या मूळ गाण्यामध्ये रवीना टंडनने अक्षय कुमार सोबत केलेला डान्स आजही अनेकांच्या लक्षात आहे. पिवळ्या साडीमध्ये रवीने लागवलेल्या ठुमक्यांची त्यावेळेस बरीच चर्चा झाली होती. मात्र 'सूर्यवंशी'मध्ये रवीनाच्याऐवजी कटरीना कैफवर (Katrina Kaif) हे गाणं चित्रित करण्यात आलंय. मात्र ही गोष्ट जेव्हा रवीना समजली तेव्हा नक्की काय घडलं होतं यासंदर्भातील खुलासा रवीनानेच केलाय. आपल्यावर चित्रित करण्यात आलेलं हे आयकॉनिक गाणं जेव्हा रिक्रिएट केलं जाणार आहे हे समजलं. त्यातही कटरिना कैफ आपल्या जागी या गाण्यामध्ये दिसणार असल्याचं समजल्यानंतर रवीनाने नवीन गाण्याची नृत्यदिग्दर्शक असणाऱ्या फराह खानला (Farah Khan) फोन करुन धमकावलं होतं. यासंदर्भातील खुलासा रवीनाने 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधील रविवारच्या भागात केलाय. रविवारी झालेल्या कपिल शर्मा शोच्या 'मैत्री विशेष' कार्यक्रमामध्ये फराह खान आणि रवीना टंडन पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळेस दोघींना 'टिप टिप बरसा पानी' गाणी रीक्रिएट करण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी एक मजेदार किस्सा शेअर केला. हे गाणं रीक्रिएट करताना फराह खानला फारच टेन्शन आलं होतं, असं तिने सांगितलं. "मला हे गाणं नीट बसवण्यासंदर्भातील फार चिंता वाटतं होती कारण हे एक आयकॉनिक गाणं आहे. सर्वांना हे गाणं म्हणजे रवीनाचं गाणं, तिने पिवळ्या साडीत केलेले डान्स सर्व काही आजही लक्षात आहे. त्यात ही (रवीना) मला फोन करुन 'तू हे गाणं खराब करु नकोस,' असं सांगत होती," असं फराह म्हणाली. पुढे बोलताना फराहने, "मात्र जेव्हा गाणं प्रदर्शित झालं तेव्हा मी फार आनंदात होते. रवीनाचा सर्वात आधी मला फोन आला आणि तिने गाणं फार छान चांगलं झालंय, तू फार छान काम केलंय. तसेच कटरीना गाण्यामध्ये फारच छान दिसतेय, असं सांगितलं," अशी माहिती दिली. त्यानंतर कपिलने मस्करीमध्ये फराह सांगतेय ते खरं आहे का असं रवीनाला विचारलं असताना तिने हसत हसतच, 'नाही,' असं उत्तर दिलं आणि सर्वचजण पुन्हा हसू लागले. पुढे बोलताना रवीनाने, फराह सोडून इतर कोणी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं असतं तर गाण्याच्या दर्जा घसरला असता, असं मत व्यक्त केलं. "फराह हे गाणं बसवत असल्याने मला ही खात्री होती की ओरिजनल गाण्याचा मान राखण्याबरोबरच गाण्याचा नाजूकपणा जपला जाईल," असंही रवीना म्हणाली.