Ajit Pawar Reply On Sankarshan Karhade’s Poem : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवत्तेपणा आणि त्यांच्या मिश्किल टिपण्ण्या या सर्वांच्याच परिचित आहेत. अनेक कार्यक्रमात अजित पवार त्यांच्या खास शैलीत एखाद्या घटनेवर, प्रसंगावर मिश्किल टिपण्णी करत असतात. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची शाळा घेतली.

‘कुणी माझ्या वाट्याला गेलं तर त्याला मी सोडत नाही’, असं म्हणत अजित पवारांनी संकर्षणची शाळा घेतली आणि भर कार्यक्रमात एकच हशा पिकला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापनदिन सोहळा नुकताच पार पडला आणि या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात स्पृहा जोशी, प्रवीण तरडे आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संकर्षण कऱ्हाडेच्या एका राजकीय कवितेवर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. याबद्दल ते म्हणाले, “संकर्षणने मराठवाड्याचा उल्लेख केला, सासुरवाडीचा उल्लेख केला. बराच काही बोलून गेला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे त्यांचं टिपिकल वाक्य आहे. परभणीत काही असो किंवा नसो… एवढं वाक्य मात्र त्यांना चांगलं जमतं. खोटं नाही सांगत, मी तिथे काम केलंय.”

यानंतर अजित पवार म्हणतात, “त्याला मी जास्त लक्षात ठेवलं; कारण त्याने मगाशी ५० टक्के तर खोटंच सांगितलं आहे. हे त्याच्या तोंडावर सांगतो. कारण तुम्हाला माहीत आहे की, मी किती खरं बोलतो. निवडणुकीच्या काळात त्याने आम्हा राजकारण्यांवर केलेली कविता खूप गाजली. त्यात ‘पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले’ असं म्हटलं होतं.” तेवढ्यात संकर्षण त्यांना “सर, हे मी बोललो नव्हतो” असं सांगतो.

यावर अजित पवारही त्याला उत्तर देत म्हणतात, “तू मगाशी मी न सांगितलेलं बोलला ना? माझ्या कामाची एक पद्धत असते. मी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी त्याला सोडत नाही. ही गोष्ट उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु, आता ती कविता मी तुझ्या नावावर खपवतो.” यानंतर भर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

यापुढे ते सांगतात, “बाबा रे, मी स्वत: गाईचं शेण काढलंय, धारा काढल्या आहेत. मी शेतात राबतो. आता गणेशोत्सवात मी बारामतीला जाणार आहे. तेव्हाही तासभर वेळ काढून मी माझ्या शेतात जाणार आहे. मी अचानक राजकारणात आलो. मला सगळे म्हणायचे की, तू इतका स्पष्ट बोलणारा आहेस, तू राजकारणात टिकणार नाहीस. तुझं न चालणार नाणं आहे. पण त्यांना काय माहीत होतं की, जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यामुळे नाणं पुढे जाईल.”

यावेळी अजित पवारांनी संकर्षणचं कौतुकही केलं. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून पुढे येणं आणि त्यातून आपला वेगळा ठसा उमटवणं ही येड्या गबाळ्याचं काम नाही आणि संकर्षणने ते सिद्ध केलं आहे. त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. त्याबद्दल तुझं कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दरम्यान, यावेळी आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार देऊन संकर्षणचा सन्मान करण्यात आला.