Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Megha Dhade Reaction : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. बॉलीवूडसह मराठी सेलिब्रिटींनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीर येथील प्रसिध्द पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली. यानंतर संपूर्ण देश हादरला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडेने या प्रकरणी भावुक होत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “नमस्कार! मी अभिनेत्री मेघा धाडे…काश्मीर येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. ज्यांच्यावर गोळीबार झाला, त्यांचा दोष फक्त एवढाच होता की, ते हिंदू होते. आपल्या देशात येऊन, निष्पाप नागरिकांना मारून निघून जाणं…यांना एवढी हिंमत कोण देतं? यामागे कोणाचा हात आहे? पहलगाममध्ये हल्ला करणारे लश्कर-ए-तैयबाचे पाकिस्तानी दहशतवादी होते मग, ते इथवर कसे पोहोचले? एवढंच नव्हे तर, बांगलादेशमध्ये सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती आहे. या लोकांना कोण एवढी ताकद देत असेल…हो आपला देश हिंदूराष्ट्र आहे आणि हे हिंदूराष्ट्रच असलं पाहिजे यावर माझं ठाम मत आहे. हे घुसखोरांचं राष्ट्र नाहीये. या घुसखोरांना एवढी ताकद कुठून मिळते, यांचे बनावट आधारकार्ड बनवले जातात. यांच्यात एवढी हिंमत येतेच कशी?”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “एक है तो सेफ है’ हा नारा या मूर्ख सेक्युलर लोकांना सांप्रदायवाद वाटतो. आज मी तुम्हाला सांगते, सेक्युलर हा शब्द मला एका गलिच्छ शिवीसारखा वाटतो. कोण आहेत हे लोक? जे म्हणतात ना… दहशतवादाला धर्म नसतो, ती मानसिकता असते. नाही! मी म्हणेन, दहशतवादाला धर्म आहे. आजही आपण एक झालो नाही तर हे असंच होत राहणार…आज महाराष्ट्रात आपण सुरक्षित आहोत. पण, इथेही असा काळ होता जेव्हा आपण सुरक्षित नव्हतो. मुंबईतही असे भ्याड हल्ले झाले होते…तेव्हा आपण गप्प बसलो. पण, आपण किती दिवस गप्प बसणार? जोपर्यंत तुमच्या घरातलं कोणी जात नाही तोवर की, तुमचा जीव जात नाही तोवर…कसा सामना करणार या आतंकवादाचा? या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजे. आता आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे. मला प्रचंड संताप येतोय, खरंतर हे सगळं सहन होत नाहीये.”

“मी कोणत्याही राजकीय दृष्टीकोनातून या सगळ्याकडे बघत नाहीये. मी माणूस म्हणून, हिंदू म्हणून या सगळ्याकडे पाहतेय आणि तुम्ही सुद्धा याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याचं बळ मिळूदेत. या पलीकडे आता आपण काय करू शकतो याचा नीट विचार करा..जय हिंद, जय भारत, वंदे मातरम!” असं मेघा धाडेने म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार चालू आहेत. यातील काही लोक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.