काही कलाकृती प्रेक्षकांच्या दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतात. एखादा चित्रपट किंवा मालिका ही त्याच्या कथानक, कलाकारांचा अभिनय, पुढे जाणारी गोष्ट यामुळे लक्षात राहते. अशाच एका मालिकांपैकी एक म्हणजे ‘का रे दुरावा’ ही मालिका आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेतील जय व अदिती या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ‘का रे दुरावा’ या मालिकेत जयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुयश टिळक(Suyash Tilak)ने एका मुलाखतीत त्याला ही भूमिका कशी मिळाली होती, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला सुयश टिळक?

अभिनेता सुयश टिळकने गोळाबेरीज या पॉडकास्ट चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला का रे दुरावा या मालिकेत भूमिका कशी मिळाली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सुयशने म्हटले, “गंमत अशी आहे की, ती मालिका माझ्याच नशिबात लिहिली होती. त्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, जेव्हा मी अभिनेता म्हणून सुरुवात केली तेव्हा मी काही मालिकांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो. काही भूमिका किंवा काही कॅरेक्टर्स करत होतो; लीड म्हणून काम करत नव्हतो. त्याआधी मी एक मालिका करीत होतो. ‘का रे दुरावा’साठी मी ऑडिशन दिली होती. पण एक-दीड महिना मला त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळालं नाही. महिना-दीड महिना मला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मला वाटलं की, माझी निवड झाली नाहीये किंवा माझ्याशिवाय ती मालिका होत आहे. त्यावेळी मी पुढचं पाऊल नावाची मालिका करीत होतो. ‘पुढचं पाऊल’ सुरू असताना मला दूर्वा नावाची मालिका मिळाली. त्यात मला फार वेगळं पात्र मला साकारायला मिळालं. भूपती पाटीलच्या त्या पात्रानं मला खूप समृद्ध केलं. बऱ्याच गोष्टी त्या मालिकेदरम्यान घडत होत्या.”

“जवळजवळ एक वर्ष त्या मालिकेत मी काम करत होतो आणि जसा माझा मालिकेतील प्रवास संपला तसा मला परत फोन आला. मला सांगितलं गेलं की, एक ऑडिशन करायची आहे, तर तू येऊन जा. मी ऑडिशनला गेलो. स्क्रिप्ट वाचली आणि म्हटलं वर्षभरापूर्वी याच दोन पात्रांसाठी ऑडिशन केली होती का? तर तो कास्टिंग डायरेक्टर म्हणाला की, हो तेच पात्र आहे; फक्त आता स्टोरी पुढे गेली आहे. तर आधी जी स्टोरी होती. जय आणि अदिती ही दोन पात्रे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जय तिला इम्प्रेस करायला वेगवेगळे फंडे वापरत असतो. ती लव्ह स्टोरी, मग पुढे लग्न आणि मग पुढचा प्रवास, असं होतं. वर्षभर मालिका काही झाली नव्हती. डायरेक्ट असं ठरलं होतं की, आता लग्नापुढचा प्रवास दाखवायचा.”

हेही वाचा: Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

“मी ऑडिशन दिली; पण त्यानंतरही काही पटकन प्रतिसाद मिळाला नाही. काही गोष्टी घडत नव्हत्या. खासगी आयुष्यातील काही गोष्टींबरोबरसुद्धा मी संघर्ष करत होतो. तर मी मुंबईतून पुण्याला यायला निघालो होतो. तर मला फोन आला की, संध्याकाळी लूक टेस्ट करायची आहे, तर तू ये. मी त्याला म्हटलं की, मी निघालोय पुण्याला. तर तो मला म्हणाला की, वेडेपणा करू नकोस. ये परत. मला असं झालेलं की, मला आता परफॉर्म करता येणार नाही. कारण- मी वेगळ्या मनस्थितीत आहे. डोक्यात अनेक विचार चालू होते. तिथे मी पोहोचलो. माझा व सुरुचीचा सीन शूट करायचा होता. त्यावेळी मी सुरुचीशी खूप भावनाहीनपणे वागलो. मी थेट गेलो, सीन वाचला. म्हटलं सांगा काय करायचं आहे ते. मला निघायचं होतं. कारण- मी डिस्टर्ब होतो. मला असं झालं होतं की, मला आता नकोय शूटिंग, प्रोजेक्ट, काम काही नकोय. थोडी शांतता पाहिजे होती. मित्रमंडळी, घरचे लोक पाहिजे होते. मी गेलो, शूट केलं आणि मी विचारलंही नाही की काय झालं, कसं झालं आणि मी निघालो.”

“मी संध्याकाळी घरी पोहोचत होतो तोपर्यंत मला फोन आला की, अमुक अशा तारखेपासून आपण ऑन फ्लोअर जातोय. चॅनेलला ऑडिशन खूप आवडली आहे. मी म्हटलं हे कसं शक्य आहे? तर तो मला म्हणाला की, मस्त झाला सीन. मला विश्वास बसत नव्हता. झी मराठी हे घराघरांत पोहोचलेलं चॅनेल होतं. त्या वाहिनीवर लीड कॅरेक्टर करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ते झालं असं, जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला खूप वेळ गेला पचवायला. मी पुण्याला येऊन लगेच परत निघालो”, अशी आठवण अभिनेत्याने सांगितली आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

दरम्यान, सध्या सुयश टिळक व सुरुची अडारकर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suyash tilak reveals he behave emotionless with suruchi adarkar during ka re durava marathi serial shooting nsp