मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी एकादशीची वारी नियमित सुरू झाली. यंदा या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ५ हजार विशेष बस चालवण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ जून ते ०५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. औरंगाबाद प्रदेशातून १,२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १,२००, नाशिक १ हजार आणि अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 thousand special bus for pandharpur yatra prepared by st for ashadhi ekadashi mumbai print news ysh