मुंबई : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली बेस्टची सेवा २४ ते ४८ तासांत पूर्ववत होईल, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. बेस्टच्या ताफ्यातील ३०५२ बस गाडय़ांपैकी २६५१ बस गाडय़ा कार्यरत असून एसटीच्या १८० बस गाडय़ा आणि २०० हून अधिक स्कूल बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांसाठी बेस्टची वाहतूक एक-दोन दिवसांत पूर्ववत होईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेस्टच्या ताफ्यातील ३०५२ बस गाडय़ांपैकी १३८१ बेस्टच्या मालकीच्या असून १६७१ बसेस भाडे तत्त्वावरील आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे गेल्या काही दिवसांपासून हाल सुरू आहेत. बेस्ट सेवा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून त्या संदर्भात माहिती देताना लोढा म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन भाडेतत्त्वावरील बस गाडय़ांच्या मालकांसह दोन वेळा बैठक घेण्यात आली. कामगारांची किमान वेतनाची मागणी, दिवाळी बोनस आणि त्यांना आवश्यक सोयीसुविधा, या सर्वाची कायदेशीर पूर्तता व्हावी, असे सरकारतर्फे कंत्राटदार बसमालकांना सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन नाही आणि याबाबत पुन्हा बैठक घेतली जाईल. सध्या ४०० बस गाडय़ांचा तुटवडा असून तो भरून काढण्यासाठी या गाडय़ांसाठी चालक शोधण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे लोढा यांनी नमूद केले. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा, असे सरकारचे धोरण असून, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच पूर्ण क्षमतेने बेस्टची सेवा रुजू होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. या वेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best service restore within 24 to 48 hours says guardian minister mangal prabhat lodha zws